Atul Bhosale : पृथ्वीराजबाबांना धूळ चारणाऱ्या अतुल भोसलेंना फडणवीसांकडून 'टॉनिक'; सातारा लोकसभेतील कामगिरीची बक्षिसी!
Sarkarnama May 14, 2025 02:45 AM

Satara, 13 May : भारतीय जनता पक्षाने आज (ता. 13 मे) राज्यातील तब्बल 58 जिल्हाध्यक्षांच्या नावाची घोषणा केली आहे. यामध्ये काही मोजक्या आमदारांना जिल्हाध्यक्षपदाची संधी मिळाली आहे, त्यात कऱ्हाड दक्षिणचे आमदार अतुलबाबा भोसले यांचा समावेश आहे. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराजबाबा चव्हाण यांच्यासारख्या मुरब्बी राजकारणाच्या विरोधात लढण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी जिल्हाध्यक्षपदाच्या माध्यमातून मोठे बळ देण्याचा पुन्हा एकदा प्रयत्न केला आहे. याशिवाय साताऱ्यात भाजपची संघटनात्मक ताकद वाढविण्याची जबाबदारी आता भोसले यांच्या खांद्यावर असणार आहे.

अतुल भोसले यांनी नोव्हेंबरमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचा कराड दक्षिण मतदारसंघातून पराभव केला आहे. भोसले यांच्या विजयामुळे काँग्रेसचा गड असलेल्या कराड दक्षिणमध्ये प्रथमच कमळ फुलले आहे. काँग्रेसचा गड भेदणाऱ्या अतुलबाबा यांच्या खांद्यावर जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी देऊन फडणवीसांनी भोसलेंना आणखी ताकद दिली आहे. त्याचा फायदा भोसले यांना आपल्या मतदारसंघाबरोबरच जिल्ह्यातही भाजप वाढविण्यासाठी होणार आहे.

विधानसभेची निवडणूक पहिल्यांदा जिंकणाऱ्या भोसले यांच्या गळ्यात जिल्हाध्यक्षपदाची माळही पहिल्यांदाच पडली आहे. जिल्हाध्यक्षपदासाठी धैर्यशील कदम, खासदार उदयनराजे भोसले यांचे निकटवर्तीयांसह अनेक नेते इच्छूक होते. मात्र, पक्षाने आमदार अतुल भोसले यांच्यावर साताऱ्यात भाजप वाढविण्याची जबाबदरी सोपवली आहे.

अतुल भोसले यांनी तीनवेळा विधानसभेची निवडणूक लढवली आहे. त्यात २०१४ आणि २०१९ मध्ये त्यांना अपयश आले होते. मात्र, २०२४ च्या निवडणुकीत अतुल भोसलेंनी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांना चीतपट करत विधानसभा गाठली. तत्पूर्वी भोसले यांना २०१७ ते २०१९ या कालावधीत पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे अध्यक्षपद देऊन बळ देण्याचा प्रयत्न भाजपकडून विशेषतः देवेंद्र फडणवीस यांच्याकडून झाला होता.

नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत अतुल भोसले यांच्यावर सातारा मतदारसंघाच्या प्रभारीपदाची जबाबदारी देण्यात आली होती. भोसले यांनी लोकसभा निवडणुकीत संघटनात्मक कामाची दाखवलेली चुणूक पाहून भाजपने संपूर्ण साताऱ्याची जबाबदारी भोसले यांच्या खांद्यावर दिली आहे. संघटन कौशल्य, सर्वसामावेशक नेतृत्व, सर्वांशी सलोख्याचे संबंध हे भोसले यांच्या जमेच्या बाजू आहेत.

अतुल भोसले यांच्यावर २०१५ मध्ये प्रदेश चिटणीस म्हणून पक्षाकडून जबाबदारी देण्यात आली होती. कराड नगरपालिकेत भाजपचा पहिला नगराध्यक्ष निवडून आणण्याची किमया त्यांनी करून दाखवली होती. तसेच, जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकांमध्ये भाजपचे उमेदवार निवडून आणण्याचे आणि कराड तालुक्यात भाजपाचे वर्चस्व वाढविण्यात महत्त्वाची भूमिका भोसले यांची राहिली आहे. प्रदेश कार्यकारिणीवर सदस्य म्हणून अतुल भोसले यांनी काम केले आहे. गोव्यासह महाराष्ट्रातील विविध निवडणुकांमध्ये पक्षाचे प्रचारक म्हणून त्यांनी यशस्वी जबाबदारी पार पाडली आहे. त्यामुळेच फडणवीसांचे निकटवर्तीय म्हणून त्यांना ओळखले जाते.

साताऱ्यात भाजप नंबर वन करण्यासाठी प्रयत्न करेन : अतुल भोसले

सातारा जिल्हाध्यक्षपदाच्या निवडीबाबत आमदार अतुल भोसले म्हणाले, भारतीय जनता पक्षाने माझ्यावर जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी सोपवली आहे. त्याबद्दल मी पक्षश्रेष्ठींचा कृतज्ञ आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण व इतर वरिष्ठ नेतृत्वाचे मी आभार मानतो.

साताऱ्यात भाजपच्या मजबुतीसाठी मी मनापासून काम करेन. पक्षाची विचारधारा घरोघरी पोचविण्यासाठी, नव्या कार्यकर्त्यांना संधी देणे, पक्ष आणि कार्यकर्त्यांना बळ देण्यासाठी आणि पक्ष संघटनेला अधिक प्रभावी करण्यासाठी मी कटिबद्ध असेन. पक्षाला जिल्ह्यात अग्रस्थानी ठेवण्याचा माझा प्रयत्न राहणार आहे, असेही भोसले यांनी म्हटले आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.