ढिंग टांग : स्वबळाचा नारा...!
esakal May 29, 2025 11:45 AM

माझ्या सर्व पक्ष सहकाऱ्यांनो, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका चार महिन्यांवर आल्या असल्या तरी अजून हवा म्हणावी तशी तापलेली नाही. ‘मला अजून निवडणूक जाणवत नाही’ असे उद्गार महाराष्ट्राचे नवनिर्माते आणि दादरचे आमचे मित्र श्रीमान साहेबांनी काढले आहेत.

तथापि, हे उद्गार साहेबांनी स्वत:चे पोट चेपत काढल्याने गैरसमज झाला!! निवडणूक जाणवत नसली तरी ती ‘आहे’! याची जाणीव आपले सर्वांचे पूजनीय माननीय व वंदनीय, तसेच प्रात:स्मरणीय श्री. मोटाभाई यांनी नुकतीच करुन दिली आहे.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका चार महिन्यांवर येऊन ठेपल्या असून कामाला लागा, असा आदेश आपल्याला देऊन ते दिल्लीला निघून गेले आहेत. त्यांनी दिलेल्या तपशीलवार सूचना कार्यकर्त्यांकडे पोचवण्याची जबाबदारी माझ्याकडे देण्याचे आदेश त्यांनी प्रदेशाध्यक्ष बावनकुळेसाहेबांना देण्याची सूचना ज्येष्ठ नेते वीर विनोद तावडेजी यांना करण्यास खुद्द आशिषजी शेलार यांनाच फर्मावून ते दिल्लीस रवाना झाले आहेत.

आपली कमळ पार्टी ही शिस्तबद्ध कार्यकर्त्यांची संघटना असल्याने (या प्रोटोकॉलनुसार) आदेश माझ्यापर्यंत अचूक पोचला आहे; पण तो माननीय गिरीशजी महाजनांमार्फत! तसेच कार्यकर्त्यांना सूचना देण्यासंबंधीच्या सूचना माननीय राणेसाहेबांनी देण्यास सुरवात केली आहे. तोही (तसे पाहू गेल्यास) प्रॉपर चॅनलच समजावा! असो. सूचना येणेप्रमाणेः

१) निवडणूक जाणवत नाही, म्हणून कोणीही गाफील राहू नये! किंबहुना, निवडणूक जाणवत नाही, हाच अपप्रचार किंवा फेक नॅरेटिव समजून कामाला लागावे!

२) निवडणूक जाणवत नसतानाही आणि आपला पक्ष इतका बलवान असूनही आपले सहकारी आणि मित्र माननीय कर्मवीर भाईसाहेब (मु. पो. ठाणे) यांनी मा. मोटाभाईंना भेटून एकशेसात जागा मागितल्या. त्यावेळी मोटाभाईंनी चहा मागवला होता. एकशेसात हा आकडा ऐकून मोटाभाईंनी चहा क्यान्सल केला, यात सारे काही आले! समजून घ्या!!

३) मोटाभाईंच्या मुंबई दौऱ्यात एकाही कार्यकर्त्याने अर्थमंत्री मा. दादासाहेब बारामतीकर यांच्याबद्दल तक्रार केली नाही. यामुळे मोटाभाई नाराज झाले आहेत! ‘इतके कामाला लागा की तक्रार घेऊन माझ्याकडे दादासाहेबच आले पाहिजेत!’ अशी मोटाभाईंची सक्त सूचना आहे.

४) एवढे करुनही दादासाहेब तक्रार घेऊन मोटाभाईंकडे जातील, याची ग्यारंटी नाही. पण चहा पिऊन जातील!

५) गेल्या वेळेस आपण संधी असूनही मुंबई महापालिकेवर सत्ता काबीज केली नाही. मातोश्रीवाल्यांना सत्ता देऊन टाकली. ही दिलदारी महागात गेली! परिणामी, औंदा आपणच बाजी मारायची, या इराद्याने कामाला लागावे!

६) आपला पक्ष जगात सर्वात बलवान लोकशाही पक्ष आहे. आपण स्वबळावर लढायची तयारी केली पाहिजे की नाही?

७) मुंबई कमळेकडे, ठाणे भाईसाहेबांकडे आणि पुणे दादासाहेबांकडे असे इस्टेटीचे सोपे वाटप करावे, असाही एक प्रस्ताव आहे. तो मान्य करायलाही हरकत नाही. पण भाईसाहेब आणि दादासाहेब सगळीकडेच थोडा थोडा वाटा मागू लागल्याने पंचाईत झाली आहे. यावर एकमेव उपाय म्हणजे- स्वबळ!

८) महाविकास आघाडी आता अगदीच तोळामासा प्रकृतीची झाली आहे. कारण तिथलेच उमेदवार हल्ली आपल्याकडून अर्ज भरतात. त्यांनी उभे करायचे तरी कोणाला, आणि प्रचार तरी कोणाचा करायचा अशी परिस्थिती आहे.

९) चार महिन्यांत स्वबळावर निवडणुका लढवायच्या, मग महायुतीचे काय करायचे, असा प्रश्न कोणीही विचारायचा नाही. आणि फायनल -

१०) उपरोक्त सर्व सूचना या सतरंज्या उचलणाऱ्या निरलस आणि निरपेक्ष पक्षकार्यकर्त्यांसाठीच आहेत, नेत्यांसाठी नाहीत, याची नोंद घ्यावी! सबब, कुठलीही सबब न सांगता निवडणुका जाणवून घेण्याच्या कामाला लागावे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.