रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने आयपीएलच्या 18 व्या मोसमातील क्वालिफायर 1 मध्ये पंजाब किंग्सवर एकतर्फी विजय मिळवत फायनलमध्ये धडक दिली आहे. महाराजा यादवेंद्र सिंह आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियममध्ये झालेल्या सामन्यात आरसीबीने पंजाबसमोर 102 धावांचं माफक आव्हान ठेवलं होतं. आरसीबीने हे आव्हान 1 विकेटच्या मोबदल्यात 10 ओव्हरमध्ये पूर्ण केलं आणि पहिल्याच झटक्यात फायनलचं तिकीट मिळवलं. आरसीबीने 10 ओव्हरमध्ये 106 रन्स केल्या. यासह आरसीबीची ही आयपीएल स्पर्धेच्या इतिहासात अंतिम फेरीत पोहचण्याची चौथी तर 2016 नंतरची पहिली वेळ ठरली. तर दुसऱ्या बाजूला पंजाबला या पराभवानंतरही अंतिम फेरीत पोहचण्यासाठी आणखी एक संधी मिळणार आहे.
आरसीबीच्या गोलंदाजांनी पंजाबला पद्धतशीर 14.1 ओव्हरमध्ये 101 धावांवर गुंडाळलं. त्यामुळे 102 धावांचं माफक आव्हान मिळालं. गोलंदाजांनंतर आरसीबीच्या फलंदाजांनी धमाका करत 60 बॉल राखून आव्हान पूर्ण केलं. आरसीबीच्या 4 फलंदाजांनी विजयात योगदान दिलं. आरसीबीसाठी फिल सॉल्ट याने सर्वाधिक योगदान दिलं. तर विराट कोहली,मयंक अग्रवाल आणि कर्णधार रजत पाटीदार या तिघांनीही धावा जोडल्या.
विराट कोहली आणि फिलीप सॉल्ट या सलामी जोडीने 30 धावांची भागीदारी केली. विराट फटकेबाजी करुन आरसीबीला एकहाती विजय मिळवून देण्याच्या प्रयत्नात होतं. मात्र त्याला तसं करता आलं नाही. विराट 12 रन्स करुन आऊट झाला. आरसीबीला 30 रन्सवर पहिला झटका लागला. विराट आऊट झाल्यानंतर मयंक अग्रवाल मैदानात आला. फिलीप आणि मंयक या जोडीने अर्धशतकी भागीदारी करत आरसीबीचा विजय सुनिश्चित केला.या दोघांनी 54 रन्सची पार्टनरशीप केली. मुशीर खान याने मंयक अग्रवाल याला आऊट करत आयपीएल कारकीर्दीतील पहिली विकेट मिळवली. मंयकने 13 बॉलमध्ये 19 रन्स केल्या.
त्यानंतर फिलीप आणि रजत पाटीदार या जोडीने आरसीबीला विजयापर्यंत पोहचवलं. रजत पाटीदार याने 8 चेंडूत नाबाद 15 धावा केल्या. तर फिलीप सॉल्ट याने 27 बॉलमध्ये 207.41 च्या स्ट्राईक रेटने नॉट आऊट 56 रन्स केल्या. फिलीपने या खेळीत 3 सिक्स आणि 6 फोर लगावले.
आरसीबी फायनलमध्ये
रजत पाटीदार याने टॉस जिंकून पंजाबला बॅटिंगसाठी भाग पाडलं. मात्र पंजाबच्या फलंदाजांनी आरसीबीसमोर गुडघे टेकले. जोश हेझलवूड आणि सूयश शर्मा या जोडीने प्रत्येकी 3-3 विकेट्स घेत पंजाबचं कंबरडं मोडलं. तर यश दयालने 2 विकेट्स मिळवल्या. तर भुवनेश्वर कुमार आणि रोमरिया शेफर्ड या दोघांनी 1-1 विकेट मिळवली. त्यामुळे आरसीबीने पंजाबला 101 रन्सवर रोखलं आणि 102 धावांचं आव्हान सहज पूर्ण करत चौथ्यांदा अंतिम फेरीचं तिकीट मिळवलं. आता आरसीबीने ट्रॉफी जिंकावी आणि गेल्या 17 वर्षांची प्रतिक्षा संपवावी, अशी आशा चाहत्यांची असणार आहे.