संजय सूर्यवंशी, साम टीव्ही
नांदेड : वैष्णवी हगवणे प्रकरणानंतर मराठा समाजाने कडक पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. लग्नातील होणारा बडेजाव आणि खर्च टाळण्यासाठी थेट आचारसंहिता ठरवली आहे. लग्न समारंभाची आचारसंहिता ठरवण्यासाठी नांदेडमध्ये मराठा समाजाची बैठक पार पडली आहे. जिल्हास्तरावर ही सुकाणू समिती स्थापन करण्यात आली आहे.
सुकाणू समितीच्या माध्यमातून जनजागृती करण्यासाठी स्थापन करण्यात आली आहे. समितीच्या माध्यमातून ही जनजागृती केली जाणार आहे. लग्न समारंभाच्या आचारसंहितेसाठी मराठा समाजाने विशेष बैठकमध्ये नांदेडमध्ये बैठक आयोजित केली होती. साध्या पद्धतीने लग्न करा, अवास्तव खर्च टाळा, असा सूर मराठा समाजाच्या या बैठकीत निघाला.
मराठा समाजाने अचानक मोठा निर्णय का घेतला?
पुण्यात वैष्णवी आत्महत्या प्रकरण समोर आल्यानंतर लग्नात होणारा बडेजाव आणि खर्च चर्चेत आला. त्या अनुषंगाने मराठा समाजाची अहिल्यानगर येथे बैठक पार पडली होती. त्यात लग्न समारंभात काही आचारसंहिता ठरवण्यात आली होती. त्यानंतर आज मराठा समाजाची नांदेड येथे बैठक पार पडली. या बैठकीला वेगवेगळ्या संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते. या बैठकीत काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले.
होणारा अवास्तव खर्च टाळण्यात यावा, डीजेवर बंदी घालण्यात यावी, प्री-वेडिंग शूट करू नये, हुंडा देऊ नये, तसेच घेऊ नये, हळद समारंभाचा कार्यक्रम छोटेखानी करावा, या सर्व विविध विषयावर चर्चा करण्यात आली. सर्व संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना घेऊन एक सुकाणू समिती निर्माण करण्यात आली. या समितीच्या माध्यमातून गाव पातळीवर प्रबोधन केले जाणार आहे. त्याचबरोबर जास्तीत जास्त सामूहिक विवाह सोहळ्यावर भर देण्यात यावा, असाही सूर या बैठकीतून निघाला आहे.