श्रीगोंदे : येथील दुय्यम कारागृहात मोबाईल फोन सापडल्याचा धक्कादायक प्रकार महिनाभरापूर्वी घडला आहे. या प्रकारामुळे तुरूंग प्रशासन व पोलिस कर्मचारी संशयाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. दरम्यान, सदर बराकीत न्यायालयीन कोठडीतील आरोपी असल्याने घटनेची जबाबदारी आमची नसल्याचे सांगत पोलिसांनी हात झटकण्याचा प्रयत्न केला आहे.
येथे दुय्यम कारागृह आहे. त्यात चार बराकी असून श्रीगोंदे व बेलवंडी पोलिस ठाण्याच्या गुन्ह्यांमधील पोलिस व न्यायालयीन कोठडीतील आरोपी तिथे ठेवले जातात. तुरुंगाधिकारी दिगंबर पवार हे १६ जून रोजी रात्री नऊच्या सुमारास नियमित तपासणीसाठी कारागृहात गेले होते. त्यावेळी एका बराकीसमोरील कचरा कुंडीत त्यांना मोबाईल असल्याचे दिसून आले.
तुरुंगाधिकारी दिगंबर पवार यांनी कारागृहात मोबाईल सापडल्याची नोंद नोंदवहीत केल्याची माहिती आहे. तुरुंगाधिकाऱ्यांनी मोबाईल फोन कर्तव्यावरील पोलिसांच्या स्वाधीन केला. त्यावर पोलिसांनी याबाबत चौकशी करून पुढील कारवाई करण्याचे सांगितले होते. याला महिन्याभराचा कालावधी उलटला, तरी दोषींवर कारवाई होणे तर दूरच अद्याप कोणतीही चौकशीच झाली नसल्याची माहिती मिळाली.
या प्रकाराने पोलिस व तुरुंग प्रशासनाबाबत अनेक गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत. कारागृहाला पोलिस बंदोबस्त तर आहेच. शिवाय, त्यावर सीसीटीव्हीची नजर असतानाही मोबाईल फोन आतमध्ये कसा गेला याचा शोध घ्यावा व या संपूर्ण घटनेची वरिष्ठ पातळीवरून सखोल चौकशी करण्याची गरज आहे.