मध्यरात्री 'बिग बॉस 19'च्या घरातून स्पर्धक बाद; प्रेक्षकांनीच घरात जाऊन त्याला केलं आऊट
Tv9 Marathi November 11, 2025 05:45 PM

‘बिग बॉस 19’च्या घरातून आणखी एका सदस्याचा प्रवास संपुष्टात आला आहे. जसजसा या शोचा ग्रँड फिनाले जवळ आला आहे, तसतसा स्पर्धकांवरील दबाव वाढत चालला आहे. चार आठवड्यांनंतर या सिझनच्या विजेत्याची घोषणा होईल. त्याआधी बिग बॉसच्या घरात प्रेक्षकांना मोठा ट्विस्ट पहायला मिळाला. लाइव्ह ऑडियन्सकडून बिग बॉसच्या घरात ‘मिड-वीक एविक्शन’ करण्यात आला आहे. यामध्ये सर्वांत तगड्या स्पर्धकांपैकी एक मानला जाणाऱ्याला घराबाहेर पडावं लागलं. या स्पर्धकाचं नाव आहे इन्फ्लुएन्सर मृदुल तिवारी. गेल्या आठवड्यात बिग बॉसच्या घरातून एकाच वेळी दोन स्पर्धक बाहेर पडले. त्यानंतर आता बिग बॉसने अचानक मिड-वीक एविक्शनचा धक्का प्रेक्षकांना आणि स्पर्धकांना दिला आहे.

‘बिग बॉस 19’चे विविध अपडेट्स देणाऱ्या ‘बिग बॉस तक’ पेजवर मृदुलच्या एविक्शनची माहिती देण्यात आली आहे. यावेळी कोणत्या स्पर्धकाला बाहेर करावं, याचा निर्णय घरात गेलेल्या ऑडियन्सनेच घेतला आहे. या लाइव्ह ऑडियन्सला प्रत्येक स्पर्धकाचा परफॉर्मन्स पाहून मतदान करायचं होतं आणि या मतदानाचा निकाल अत्यंत धक्कादायक होता. कारण सर्वांत कमी मतं मृदुल तिवारीला मिळाली होती. त्यामुळे ग्रँड फिनालेच्या ठीक चार आठवड्यांआधीच मृदुलचा बिग बॉसमधील प्रवास संपुष्टात आला.

🚨BREAKING NEWS :

After #MridulTiwari Eviction #GauravKhanna Angry And Emotional….😤😤😤

He Throw the bottle on the wall and crying alot🥲🥲#BiggBoss19 #BB19 #BiggBoss #BiggBoss19OnJioHotstar pic.twitter.com/E99D0F2KGZ

— BB_Tak 👁️ (@BBTak2468)

या आठवड्यात बिग बॉसने एक खास कॅप्टन्सी टास्क ठेवला होता. यामध्ये तीन टीम बनवण्यात आली होती. टीम गौरव, टीम कुनिका आणि टीम शहबाज.. असे हे तीन टीम्स होते. या टास्कचा संचालक अमाल मलिक होता. सुरुवातीच्या दोन राऊंडमध्ये कुनिका आणि गौरवच्या टीमने बाजी मारली होती. परंतु तिसऱ्या राऊंडमध्ये बिग बॉसने गेममध्ये ट्विस्ट आणला. आता प्रेक्षकांचा निर्णय अंतिम असेल, असं बिग बॉसने जाहीर केलं. त्यानुसार लाइव्ह प्रेक्षक घराच्या आत गेले आणि त्यांनी प्रत्येक सदस्याच्या परफॉर्मन्सच्या आधारे मतदान केलं. मृदुल तिवारीला प्रेक्षकांनी सर्वांत कमी मतं दिली आणि तो थेट बिग बॉसच्या घराबाहेर पडला. मृदुलच्या एविक्शनमुळे बिग बॉसच्या घरातील इतर स्पर्धकांनाही धक्का बसला आहे. घरातील त्याचा खास मित्र गौरव खन्ना यावेळी अत्यंत भावूक झाला होता.

याआधी ‘वीकेंड का वार’ एपिसोडसुद्धा प्रेक्षकांसाठी चकीत करणारा होता. त्यात अभिषेक बजाज आणि नीलम गिरी यांना घराबाहेर काढण्यात आलं होतं. हा निर्णयसुद्धा अचानकच घेण्यात आला होता. परंतु हा निर्णय घेण्यात घराचा कॅप्टन प्रणित मोरेची महत्त्वपूर्ण भूमिका होती. आरोग्याच्या कारणास्तव काही दिवसांसाठी बिग बॉसच्या घराबाहेर गेलेल्या प्रणितला सलमान खानने विशेष पॉवर दिली होती. बॉटम 3 मधून एका स्पर्धकाला तू वाचवू शकतोस, असं सलमानने त्याला सांगितलं. बॉटम 3 मध्ये अभिषेक, नीलम आणि अशनूर होते. प्रणितने अशनूरला सेफ करण्याचा निर्णय घेतला आणि त्यामुळे अभिषेक, नीलम घराबाहेर पडले.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.