मदरशांचा सर्वे करताना तुम्ही, मग मंदिरांचा..ओवैसी यांच्या पार्टीच्या नेत्याचा सवाल, पश्चिम बंगाल सरकारच्या निर्णयावरुन वाद
Tv9 Marathi June 09, 2026 02:45 PM

पश्चिम बंगाल सरकारने मदरशांचा सर्वे करण्याचा निर्णय घेतला आहे. त्या आदेशावरुन राजकारण तापलं आहे. असदुद्दीन ओवैसी यांची पार्टी AIMIM चे वरिष्ठ नेते वारिस पठान यांनी या निर्णयावरुन सरकारवर हल्लाबोल केला आहे. भाजपं बंगालमध्ये मदरशांच्या मागे लागल्याचा आरोप त्यांनी केला आहे. वारिस पठान यांनी भाजपवर एका खास अजेंड्यातंर्गत काम करण्याचा आरोप केला आहे. मदरशांचा सर्वे करण्याच्या निर्णयावर त्यांनी कठोर शब्दात टीका केली आहे. “जेव्हापासून भाजपं सरकार सत्तेवर आलं आहे, द्वेष पसरवणं हाच त्यांचा एकमेव अजेंडा आहे” असा आरोप वारिस पठान यांनी केला.”मुस्लिमांच्या खाण्या-पिण्याच्या सवयी, बुर्के, मशिदी आणि मदरशांवरुन जाणूनबुजून द्वेष निर्माण केला जातोय” असं वारिस पठान म्हणाले. अल्पसंख्याकांशी संबंधित प्रत्येक गोष्टीबद्दल भाजपच्या मनात द्वेष भरला असून त्यांचा विरोध आहे. आता ते बंगालमधील मदरशांच्या मागे लागले आहेत असं वारिस पठान म्हणाले.

मदरशांमधील शिक्षण व्यवस्थेचं वारिस पठान यांनी समर्थन केलं. मदरशांबद्दल चुकीचा समज पसरवला जात असल्याचं ते म्हणाले. “मदरशांमधून शिक्षण पूर्ण करुन ग्रॅज्युएट होणाऱ्या यशस्वी लोकांना तुम्ही का मानत नाहीत?. मदरशांमध्ये शिक्षण घेणारे लोक आज समाजात मोठ्या पदांवर आहेत. देशाच्या विकासात योगदान देत आहेत. पण सरकार त्यांच्या योगदानाकडे दुर्लक्ष करत आहे” असा दावा वारिस पठानयांनी केला.

मग मंदिरांचा सर्वे का नाही करत?

वारिस पठान यांनी कायद्याच्या समानतेवर जोर दिला. “आपल्या देशाचं संविधान सर्व नागरिक आणि संस्थांना समान अधिकार देतं. तुम्ही मदरशांचा सर्वे करु शकता, पण मग मंदिरांचा सर्वे का नाही करत?. आपलं संविधान समानतेवर आधारित आहे. म्हणून देशाचे कायदे आणि नियम सर्वांना समानतेने लागू झाले पाहिजेत” असं वारिस पठान म्हणाले.

तरच न्याय मिळेल

“सरकारला जर खरच धार्मिक आणि शैक्षणिक संस्थांची स्थिती जाणून घ्यायची असेल, तर कुठलाही भेदभाव होऊ नये. जर, तुम्ही सर्वेच काम करताय, तर कुठल्याही पक्षपाताशिवाय सर्वे करा, तरच न्याय मिळेल” असं AIMIM नेते वारिस पठान म्हणाले.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.