राम मंदिराच्या दान पेटीतून 5 कोटी चोरीला, संजय राऊत यांचा मोठा आरोप, थेट भाजपावर..
Tv9 Marathi June 09, 2026 02:45 PM

नुकताच शिवसेना नेते संजय राऊत यांनी भाजपा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार टीका केली. संजय राऊत यांनी म्हटले की, पंडित नेहरू यांनी कोणतेही विरोधी पक्ष फोडले नाहीत, जे आज मोदी आणि शाह फोडत आहेत. अनेक राज्यांमध्ये त्यांच्या विरोधातील सरकारे आली. लोकसभेत आणि राज्यसभेत सरकारच्या विरोधात बोलणारे अनेक बुलंद नेते आले आणि त्यांनी नेहरूंच्या तोंडावर टीका केली. त्यात अटलबिहारी वाजपेयी होते हे लक्षात घ्या. पण हे आमच्या विरोधात बोलत आहेत, म्हणून त्यांचे पक्ष, त्यांच्या संघटना ताब्यात घेण्याचा प्रयत्न कोणी केला नाही. खर म्हणजे मोदींनी एक तप झाल्यानंतर केदारनाथच्या गुफेत जाणून 12 वर्षाचे आत्मचिंतन केले पाहिजे. त्यांच्या प्रमुख सहकाऱ्यांसोबत. मग त्यांनी या 12 वर्षात काय केलं याचा लेखाजोखा त्यांनी एका पत्रकार परिषदेमध्ये सादर केला पाहिजे.

पुढे संजय राऊत यांनी म्हटले की, 12 वर्षात मोदींनी एकही पत्रकार परिषद घेतली नाही. याला काही उत्तर आहे का भारतीय जनता पक्षाकडे? एकदाही जनतेने विचारलेल्या प्रश्नांनी समोर येऊन उत्तर दिली नाहीत. 12 वर्ष झालीत अजून 12 वर्ष होतील. देशाला काय उपयोग झाला? देशाच्या लोकशाहीला काय उपयोग झाला? तुम्ही फक्त पंडित नेहरूंचा पदावर राहण्याचा विक्रम मोडला असेल पण पंडित नेहरूंच्या कार्याचा विक्रम मोडणे अशक्य नाही.

पंतप्रधानपदाची घोडदाैड सुरू आहे पण त्याखाली लोकशाही तुडवली गेली. देशाचा निवडणूक आयोग तुडवडा गेला. अनेक संविधानिक संस्थांच्या छाताडावर उभे राहून त्यांची घोडदाैड सुरू आहे. म्हणून त्यांनी एक पत्रकार परिषद घेण्याचे धाडस दाखवायला पाहिजे. ऑपरेशन सिंदूर देखील त्यांना जागतिक दबावाखाली गुंडाळावे लागले. मोदी हे नेहरूंच्या अत्यंत विरूद्ध वागत आहेत. पंडित नेहरू हे देशाच्या स्वातंत्र्य लढ्यातून निर्माण झालेले एक तेजस्वी नेतृत्व होते. पंडित नेहरू यांनी देशासाठी आपली सर्व संपत्ती दान केली. ज्या संपत्तीची किमत आज 80 हजार कोटी आहे.

ही संपत्ती पंडित नेहरू यांनी देशासाठी आणि देशाच्या स्वातंत्र्यासाठी दान केली. पंडित नेहरूंच्या काळात अदानी, अंबानी हे कोणी निर्माण झाली नाही. पंडित नेहरू यांनी सार्वजनिक उद्योग निर्माण केले. तेल कंपन्या, एलआयसी, आयआयटी असे अनेक. मोदींनी काय केले? हे त्यांनी पत्रकार परिषदेमध्ये येऊन सांगायला पाहिजे. ही अपेक्षा पत्रकारांनी, जनतेने केली तर भारतीय जनता पक्षाला राग येण्याचे काम नाही. राम मंदिराच्या दान पेटीतून 5 कोटी चोरीला गेले. ही संपूर्ण व्यवस्था भारतीय जनता पक्षाच्या ताब्यात आहे म्हणते राऊतांनी गंभीर आरोप केला.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.