अतितटीच्या सामन्यात श्रीलंकेला पराभूत केल्यानंतर कर्णधार तिलक वर्माने मांडला लेखाजोखा, म्हणाला…
GH News June 10, 2026 01:10 AM

भारत अ आणि श्रीलंका अ संघ तिरंगी मालिकेतील पहिल्या सामन्यात आमनेसामने आले होते. या सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारली. तसेच 50 षटकात 6 गडी गमवून 277 धावा केल्या आणि विजयासाठी 278 धावांचं आव्हान दिलं. या धावांचा पाठलाग करताना श्रीलंकेने चांगली सुरूवात केली. त्यामुळे हा सामना भारताच्या हातून जाईल असंच वाटलं होतं. पण एक चमत्कार घडावा तसा हा सामना फिरला. श्रीलंकेच्या तोंडात असलेला विजयाचा घास भारताने हिरावून घेतला. या सामन्यातील 48 आणि 49 व्या षटकात श्रीलंकेने 4 विकेट गमावल्या. त्यामुळे भारताला विजय मिळाला. श्रीलंकेला 18 चेंडूत 17 धावा करता आल्या नाहीत. अवघ्या 8 धावांवर चार विकेट गमावल्या आणि भारताने हा सामना जिंकला. या विजयानंतर भारताचा कर्णधार तिलक वर्माने या सामन्याचा लेखाजोखा मांडला.

सामना भारताच्या बाजूने कधी झुकला? याबाबत भारत अ संघाचा कर्णधार तिलक वर्मा म्हणाला की, ‘साहन ज्या प्रकारे फलंदाजी करत होता ती खूपच चांगली होती, मला वाटतं की जेव्हा अंशुलने तो यॉर्कर टाकला आणि साहन बाद झाला, ती एक महत्त्वाची विकेट होती आणि तिथेच सामन्याला कलाटणी मिळाली. विशेषतः आमचे सलामीचे गोलंदाज अर्शद आणि कंबोज यांनी पहिल्या स्पेलमध्ये फारशी चांगली गोलंदाजी केली नसली तरी, ज्या प्रकारे त्यांनी सामना संपवला ते पाहणे जबरदस्त होते.’

तिलक वर्मा खेळपट्टीबाबत स्पष्टपणे म्हणाला की, ‘खेळपट्टी फारशी बदललेली नाही. आम्हाला वाटलं होतं की दुसऱ्या डावात ती आणखी संथ होईल, पण खरं सांगायचं तर, खेळपट्टी फारशी बदललेली नाही. पण जसं मी नाणेफेकीच्या वेळी म्हणालो, 270 धावा चांगल्या होत्या, पण मला वाटतं की आम्ही आता नव्याने विचार करू आणि चांगल्या ठिकाणी गोलंदाजी कशी करायची हे पाहू आणि पुढच्या सामन्यात पुनरागमन करू.’

तिलक वर्मा पुढे म्हणाला की, श्रीलंकेत श्रीलंका आणि अफगाणिस्तानसारख्या खूप चांगल्या संघांविरुद्ध खेळताना आव्हान असेल. तुम्ही पाहिले तर, आम्ही श्रीलंकेविरुद्ध खेळलेली शेवटची मालिका त्यांनी जिंकली होती. पण आम्हाला माहित आहे की ही स्पर्धा किती चुरशीची असेल आणि आम्ही त्यासाठी तयारी केली आहे, आणि मला आनंद आहे की पहिला सामना आमच्या बाजूने आहे.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.