मोठी बातमी! प्रवाशांची गैरसोय वाचणार, रेल्वे प्रशासनानं घेतला मोठा निर्णय, तब्बल 6000 विशेष रेल्वे गाड्या धावणार
एबीपी माझा वेब टीम September 28, 2024 01:13 AM

Indian Railways: भारतीय रेल्वेसाठी (Indian Railways) वर्षातील सर्वात मोठे आव्हान म्हणजे सणासुदीचा हंगाम. हा सणासुदीचा हंगाम अगदी जवळ आला आहे. या काळात सण साजरा करण्यासाठी लोक मोठ्या प्रमाणावर एका शहरातून दुसऱ्या शहरात जातात. यासाठी त्यांच्यासाठी सर्वात स्वस्त, आरामदायी आणि सुरक्षित प्रवासाचे साधन म्हणजे ट्रेन. अशा परिस्थितीत सणासुदीच्या काळात करोडो लोकांना त्यांच्या घरी पोहोचवण्याचे मोठे आव्हान रेल्वेसमोर उभे ठाकले आहे. या काळात रेल्वे प्रशासनाने मोठा निर्णय घेतला आहे. यंदा सणासुदीच्या काळात होणारी गर्दी हाताळण्यासाठी रेल्वेने 6 हजार विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतलाय.

सर्वच गाड्यांमध्ये जनरल डबे वाढवण्यात येणार

रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिलेल्या माहितीनुसार, दुर्गा पूजा, दिवाळी आणि छठ दरम्यान लोकांना कोणत्याही प्रकारच्या गैरसोयीचा सामना करावा लागणार नाही. मागणी वाढल्याने विशेष गाड्यांची संख्याही वाढवण्यात येणार आहे. रेल्वे तिकिटांसाठीचा हा लढा दुर्गापूजेपासून सुरू होतो आणि छठपर्यंत चालतो. हा एक महिना भारतीय रेल्वेसाठी खूप आव्हानात्मक आहे. यंदा सणासुदीच्या काळात होणारी गर्दी हाताळण्यासाठी रेल्वेने 6 हजार विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. याशिवाय जवळपास सर्वच गाड्यांमध्ये जनरल डबे वाढवण्यात येणार आहेत.

बिहार, उत्तर प्रदेश आणि पश्चिम बंगालच्या मार्गांवर मोठी मागणी 

दुर्गापूजा, दिवाळी आणि छठ दरम्यान, अनेक रेल्वे मार्गांवर विशेषत: बिहार, उत्तर प्रदेश आणि पश्चिम बंगालमध्ये जाणाऱ्यांची प्रचंड गर्दी असते. रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिलेल्या माहितीनुसार, रेल्वेने यंदाच्या सणासुदीच्या हंगामासाठी तयारी केली आहे. आम्ही प्रवाशांची कोणतीही गैरसोय होऊ देणार नाही. आतापर्यंत एकूण 5975 विशेष गाड्या चालवण्याची घोषणा करण्यात आली आहे. गेल्या वर्षी ही संख्या 4429 होती. यामुळे पूजेदरम्यान एक कोटीहून अधिक प्रवाशांना घरी जाण्याची सोय होणार असल्याचे ते म्हणाले.

प्रत्येक ट्रेनमध्ये डब्यांची संख्या वाढवणार

9 ऑक्टोबर ते 13 ऑक्टोबर दरम्यान दुर्गा पूजा उत्सव (दुर्गा पूजा 2024) चालणार आहे. यावर्षी दिवाळी (दिवाळी 2024) 31 ऑक्टोबर रोजी साजरी केली जाईल तर छठ पूजा 7 आणि 8 नोव्हेंबर रोजी आहे. मागणी वाढल्यास विशेष गाड्यांची संख्या आणखी वाढवता येईल, असे रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले. रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले की, सणासुदीच्या काळात होणारी प्रचंड गर्दी लक्षात घेता 108 गाड्यांमध्ये सामान्य श्रेणीचे अतिरिक्त डबे जोडण्याबरोबरच या श्रेणीतील 12,500 नवीन डबे बनवण्यासही मान्यता देण्यात आली आहे.

Mumbai Local Train: रेल्वे प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी, दर अडीच मिनिटांनी लोकल ट्रेन, सीबीटीसी यंत्रणेमुळे मोठा दिलासा मिळणार

© Copyright @2024 LIDEA. All Rights Reserved.