टीम इंडिया विरुद्ध बांगलादेश यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्यातील तिसऱ्या दिवसाचा खेळही रद्द करण्यात आला आहे. ओल्या खेळपट्टीमुळे खेळ रद्द करण्यात आल्याची माहिती बीसीसीआयने सोशल मीडियावरुन दिली आहे. कानपूरमधील ग्रीन पार्क येथे या सामन्याचं आयोजन करण्यात आलं आहे. पाऊस आणि ओल्या खेळपट्टीमुळे दुसऱ्या दिवसाचा खेळही एकही बॉल न टाकता रद्द करण्यात आला होता. तर पहिल्या दिवशीही फक्त 35 षटकांचाच खेळ होऊ शकला. त्यामुळे हा सामना रद्द होण्याची दाट शक्यता आहे.
बीसीसीआयकडून एकूण 3 वेळा 2 तासांच्या फरकाने खेळपट्टीची पाहणी करण्यात आली. बीसीसीआयने सकाळी 10, दुपारी 12 आणि 2 वाजता पाहणी करण्यात आली. क्रिकेट चाहत्यांना पावसानंतर खेळपट्टी कोरडी झाल्यानंतर सामन्याला सुरुवात होईल, अशी अपेक्षा होती. मात्र तसं होऊ शकलं नाही. दुपारी 2 वाजता केलेल्या पाहणीनंतर अवघ्या काही मिनिटांनी दिवसाचा खेळ रद्द करण्याचा निर्णय घेतला गेला.
टीम इंडिया या 2 सामन्यांच्या मालिकेत 1-0 ने आघाडीवर आहे. टीम इंडिया दुसऱ्या सामन्यातही बांगलादेशवर मात करुन 2-0 ने क्लीन स्वीप करण्याच्या मानसाने मैदानात उतरली. मात्र पावसामुळे 3 दिवसांनंतरही फक्त 35 षटकांचाचा खेळ होऊ शकला आहे. त्यामुळे दुसरा सामना रद्द होण्याची शक्यता आहे. तसं झाल्यास टीम इंडियाचंच नुकसान आहे, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. कारण टीम इंडियाने दुसरा सामना जिंकला असत तर डब्ल्यूटीसी फायनलचा मार्ग आणखी सोपा झाला असता. मात्र पावसामुळे आता ते शक्य नाही, असंच म्हणावं लागेल.
टीम इंडिया प्लेइंग इलेव्हन : रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, शुबमन गिल, विराट कोहली, ऋषभ पंत (विकेटकीपर), केएल राहुल, रवींद्र जडेजा, रवीचंद्रन अश्विन, आकाश दीप, जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज.
बांगलादेश प्लेइंग इलेव्हन : नजमुल हुसेन शांतो (कॅप्टन), शादमान इस्लाम, झाकीर हसन, मोमिनुल हक, मुशफिकुर रहीम, शकीब अल हसन, लिटन दास (विकेटकीपर), मेहदी हसन मिराझ, तैजुल इस्लाम, हसन महमूद आणि खालेद अहमद