चूक कोण आणि बरोबर कोण हे तुम्ही... घटस्फोटाबद्दल पहिल्यांदाच बोलला स्वप्नील जोशी; म्हणाला, 'मी अभिमानाने सांगतो की...
esakal May 06, 2025 12:45 AM

मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता स्वप्निल जोशी याने आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं. अगदी लहान असल्यापासून त्याने आपल्या अभिनयातील कारकिर्दीची सुरुवात केली. स्वप्निलचे अनेक सिनेमे बॉक्स ऑफिसवर हिट ठरले. मराठी सिनेसृष्टीतील सगळ्यात जास्त मानधन घेणारा अभिनेता असणारा स्वप्निल तरुणींमध्ये चॉकलेट बॉय म्हणून लोकप्रिय आहे. मात्र त्याचा घटस्फोट झाला होता हे अनेकांना ठाऊक नाहीये. लग्नाच्या ४ वर्षानंतर स्वप्निल वेगळा झाला. आता पहिल्यांदाच तो त्याच्या पहिल्या लग्नाबद्दल बोलला आहे.

स्वप्निलने नुकतीच 'दॅट ऑड इंजिनियर' या युट्यूबला मुलाखत दिली. यात तो त्याचं लव्ह लाइफ, लग्न आणि घटस्फोट यांबद्दल बोलला आहे. यात बोलताना स्वप्निल म्हणाला, 'मला नववीत असताना एक मुलगी आवडत होती. पण, तेव्हा मुलगी आवडते म्हणजे काय हे माहितच नव्हतं. त्यानंतर कॉलेजमध्ये एक मुलगी आवडायची. आमचं सिरियस अफेअर होतं. पण ब्रेकअप झालं. त्यानंतरही माझं एक अफेअर होतं. पहिला हार्टब्रेक खूप वाईट असतो. त्यानंतर मग माझं लग्न झालं. पण, लग्नानंतर ४-५ वर्षांनी माझा घटस्फोट झाला. त्यानंतर मग दुसरं लग्न झालं. आता सुदैवाने बायको, दोन मुलं आणि सुखी संसार आहे.

घटस्फोट घेताना लोक काय म्हणतील, हा विचार आला का? या प्रश्नावर उत्तर देताना तो म्हणाला,'माझा घटस्फोट होत होता तेव्हा सोशल मीडिया नव्हतं. तेव्हा प्रिंट आणि टेलिव्हिजन मीडिया होतं. पण, मराठीतील एकाही प्रिंट पत्रकाराने माझ्या घटस्फोटाची बातमी पेपरमध्ये छापलेली नाही. आणि हे मी नेहमी अभिमानाने सांगतो. घटस्फोट हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे. अनेक सेलिब्रिटींना सोशल मीडिया पोस्ट टाकाव्या लागतात, की आम्हाला प्रायव्हसी द्या.'

तो पुढे म्हणाला, 'एक जोडपं जेव्हा वेगळं होतं तेव्हा ते खूप यातनेतून जात असतं. ते दोघेही...चूक कोण आणि बरोबर कोण, हे कोणीही ठरवू शकत नाही. फक्त द्या दोघांना माहीत असतं की काय घडलंय. तिसऱ्या माणसाला खरंच माहीत नसतं की खरं काय घडलंय...किंवा का वेगळे होतायत. ते त्यांची लढाई लढत असतात. त्यात आपण त्यांचा त्रास कमी करत नसलो तर निदान वाढवूया तरी नको.'

स्वप्नील जोशीने २००५ साली अपर्णा जोशी हिच्यासोबत लग्नगाठ बांधली होती. मात्र लग्नानंतर ४ वर्षांनी २००९मध्ये घटस्फोट घेत ते वेगळे झाले. पहिल्या घटस्फोटानंतर दोन वर्षांनी स्वप्निलने पुन्हा लग्नाच्या बेडीत अडकण्याचा निर्णय घेतला. २०११ साली त्याने डेंटिस्ट असलेल्या लीना आराध्येसोबत नव्याने आयुष्याला सुरुवात केली. त्यांना दोन मुलेदेखील आहेत.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.