Jaish E Mohammed Headquarters: भारताच्या ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानी राज्यकर्ते चांगलेच घाबरले आहे. शस्त्रसंधीची भीक मागणारा पाकिस्तानला पुन्हा भारताच्या कारवाईची भीती वाटत आहे. यामुळे पाकिस्तानने बहावलपूरमधील दहशतवादी समूहाचे मुख्यालय ‘जामिया सुभान अल्लाह’ बंद केले आहे. भारताने मे महिन्यात ऑपरेशन सिंदूर राबवले होते. या दरम्यान जैश-ए-मोहम्मदचे पंजाब प्रांतातील बहावलपूर येथील मुख्यालयावर हल्ला केला होता. त्यात हे मुख्यालय उद्ध्वस्त झाले होते. भारताच्या हल्ल्यानंतर आता हे मुख्यालय बंद दिसत आहे. भारताने ऑपरेशन सिंदूर संपले नसल्याचे आधीच जाहीर केले आहे. त्यामुळे पाकिस्तानकडून त्याची धास्ती घेतली जात आहे.
जैश-ए-मोहम्मदचे असलेले हे मुख्यालय सार्वजनिकरित्या एक मशीद असल्याचे सांगितले जात होते. परंतु त्यात जैश-ए-मोहम्मदकडून दहशतवाद्यांना प्रशिक्षण दिले जात होते. दहशतवाद्यांची भरती करुन त्यांना जिहादी बनवले जात होते. जैश ए मोहम्मदच्या कारवाया याच ठिकाणांवरुन सुरु होत्या. आता गूगल मॅपवर हे मुख्यालय बंद दिसत आहे. तसा मेसेज दिसत आहे.
जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे २२ एप्रिल रोजी दहशतवादी हल्ला झाला होता. या हल्ल्यात २६ पर्यटकांची हत्या दहशतवाद्यांनी केली होती. त्यानंतर ६ आणि ७ मे रोजी रात्री भारताने ऑपरेशन सिंदूर राबवले. त्यात पाकिस्तान व्याप्त काश्मीर आणि पाकिस्तानमधील दहशतवाद्यांची ९ तळ उद्ध्वस्त केली. त्यात बहावलपूर येथील जैश-ए-मोहम्मदचे मुख्यालय होते. भारताच्या सीमारेषेपासून शंभर किलोमीटर लांब असलेल्या या ठिकाणी जैशचे मुख्यालय पूर्ण नष्ट झालेले दिसत आहे.
भारताच्या कारवाईत जैश-ए-मोहम्मदचा प्रमुख मसूद अजहर याच्या परिवारातील दहा जणांचा मृत्यू झाला होता. तसेच त्याच्या चार जवळच्या साथीदारांचाही मृत्यू झाला होता. भारताच्या हल्ल्यानंतर त्या ठिकाणाच्या प्रतिमा उपग्रहाकडून मिळालेल्या आहेत. त्यात हे मुख्यालय ढिगाऱ्यामध्ये बदललेले दिसत आहे. भारताच्या कारवाईनंतर पुन्हा या ठिकाणी मुख्यालय सुरु करण्याचा पाकिस्तानचा कोणताच प्रयत्न दिसत नाही.