Thackeray slams Modi over situation in Manipur
Marathi June 23, 2025 10:25 PM


योगदिनी मोदी यांनी शांततेचा संदेश दिला. पण आपल्या भारतात मणिपूर ते काश्मीरपर्यंत हिंसाचाराचा उद्रेक झाला आहे आणि पंतप्रधान मोदी मणिपुरात जाऊन शांतता प्रस्थापित करतील हा ‘योग’ काही येत नाही.

(Thackeray on Modi) मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आंध्र प्रदेशात जाऊन ‘योग’ प्रदर्शन केले. प्राणायाम झाल्यावर ते म्हणाले, ‘‘जग सध्या तणाव, अशांती आणि अस्थिरतेतून जात आहे. अनेक क्षेत्रांत हीच स्थिती आहे. अशा वेळी योग आपल्याला शांततेचा मार्ग दाखवतो.’’ मोदी यांनी संदेश तर चांगलाच दिला. खास करून शांततेचा, पण आंतरराष्ट्रीय योगदिनीच मोदी यांचे मित्र, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणवर बॉम्बहल्ला केला आहे. खुद्द आपल्या भारतात मणिपूर ते काश्मीरपर्यंत हिंसाचाराचा उद्रेक झाला आहे आणि पंतप्रधान मोदी मणिपुरात जाऊन शांतता प्रस्थापित करतील हा ‘योग’ काही येत नाही, अशी घणाघाती टीका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली आहे. (Thackeray slams Modi over situation in Manipur)

फडणवीस यांनी आंतरराष्ट्रीय योगदिनी पुण्यात वारकऱ्यांसोबत प्राणायाम केला. त्यांचे म्हणणे असे की, “योग ही आपली परंपरा, संस्कृती, आनंदी जीवनाची गुरुकिल्ली आहे. शरीर आणि मन तंदुरुस्त ठेवण्याची त्यात असाधारण क्षमता आहे.’’ फडणवीस यांनी ही नेहमीप्रमाणेच बोलबच्चनगिरी केली आहे. सर्व समस्यांवर आणि रोगांवर त्यांनी ‘योग’ हाच उपचार असल्याचे सांगितले. अर्थात, राज्यकर्त्यांच्या खोटारडेपणावर, फसवाफसवीवर ‘योग’ हा उपचार आहे काय, तर तसे दिसत नाही. कारण मुख्यमंत्री रोज उठून एक नवे ‘खोटे’ जनतेशी बोलत आहेत, अशी टीकाही उद्धव ठाकरे यांनी सामना दैनिकातील अग्रलेखाच्या माध्यमातून केली आहे.

हेही वाचा – Thackeray on Farmers Loan : हा बोलबच्चनगिरीचा कळस, ठाकरेंच्या निशाण्यावर फडणवीस

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांचे लोक रोज खोटे बोलत आहेत. आंतरराष्ट्रीय योगदिनीही त्यांनी खोटेपणाच्याच चिपळ्या वाजवल्या. महाराष्ट्रात शेतकरी आत्महत्या करीत आहेत. शेतकऱ्यांच्या जीवनातील तणाव आणि अस्थिरतेवर पंतप्रधान मोदी यांच्याकडे काय उपाय आहे? की फक्त बोलबच्चनगिरी करून वेळ मारून न्यायची हेच त्यांचे धोरण आहे, अशी जहरी टीकाही तयांनी केली.

पुण्यात फडणवीस यांनी वारकऱ्यांसोबत प्राणायाम केला, पण बाजूच्या पुरंदर तालुक्यात विमानतळास विरोध करणाऱ्या, आपल्या जमिनी वाचवू पाहणाऱ्या वारकरी संप्रदायातील शेतकऱ्यांवर पोलिसांनी निर्घृण लाठीमार केला. हे चित्र काय सांगते? महाराष्ट्रात बसून जगातील मानवतेवर धडे द्यायचे आणि आपल्या राज्यात आपल्याच लोकांचे बळी घ्यायचे असे सुरू असल्याचे उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.

हेही वाचा – Sanjay Raut : मराठी भाषेवर होणारे अतिक्रमण थांबण्यासाठी आमचा जन्म, संजय राऊतांचा हल्लाबोल



Source link

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.