नवी दिल्ली : लोकसभेतील विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांनी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील (२०२४) कथित मॅच फिक्सिंगवरून थेट निवडणूक आयोग आणि सरकारी यंत्रणेला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केल्याने पुन्हा एकदा वादाची ठिणगी पडली आहे. महाराष्ट्रातील फिक्सिंगची पुनरावृत्ती बिहार विधानसभेच्या आगामी निवडणुकीत देखील होईल, असा खळबळजनक आरोप त्यांनी काही माध्यमांत लिहिलेल्या लेखात केला होता.
राहुल यांच्या या आरोपांवरून राजकारण पेटले असून सत्ताधारी भाजपने ते खोटे बोलत असल्याचे म्हटले आहे तर आयोगानेही त्यांचे पक्षपाताचे आरोप अर्थहीन असल्याचे नमूद केले. ‘जनतेच्या प्रतिकूल निर्णयानंतर निवडणूक आयोगावर पक्षपाताचे आरोप करणे पूर्णपणे अर्थहीन आहे,’ अशा शब्दांत निवडणूक आयोगाने राहुल गांधींना प्रत्युत्तर दिले आहे. तसेच कोणताही आणि कोणाकडूनही होणारा अपप्रचार हा कायद्याचा अनादर करणारा तसेच आपल्याच राजकीय पक्षाच्या प्रतिनिधींवर अविश्वास व्यक्त करणारा आणि अथकपणे काम करणाऱ्या निवडणूक कर्मचाऱ्यांचे खच्चीकरण करणारा असल्याचे आयोगाने फटकारले. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील मतदानाच्या आकडेवारीचा दाखला देत निवडणूक आयोगाने राहुल गांधींच्या आरोपांचा प्रतिवाद केला.
आयोगाने म्हटले आहे, की महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीत सकाळी ७ ते सायंकाळी ६ या वेळेत एकूण ६ कोटी ४४ लाख ८७ हजार ५८८ मतदारांनी मतदान केले. प्रतितास ५८ लाख मते अशी मतदानाची सरासरी पाहता अंतिम दोन तासांत सुमारे ११६ लाख मतदार मतदान करू शकले असते. परंतु प्रत्यक्षात केवळ ६५ लाख मते पडली. उमेदवारांनी किंवा राजकीय पक्षांनी अधिकृतरीत्या नियुक्त केलेल्या मतमोजणी प्रतिनिधींच्या समोरच मतदान प्रक्रिया पार पडली. मतदानाच्या दुसऱ्या दिवशी निर्णय अधिकारी (आरओ) आणि निवडणूक निरीक्षकांच्या (ईओ) समोर झालेल्या परीक्षणादरम्यान काँग्रेसच्या उमेदवारांनी किंवा त्यांच्या अधिकृत प्रतिनिधींनी मतदानाबद्दल कोणतेही आक्षेप नोंदविले नव्हते.
...म्हणून आरोप आधारहीनमतदारयाद्यांच्या फेरनिरीक्षणासाठी तब्बल १,००,४२७ मतदान केंद्रांसाठी ९७ हजार ३२५ बूथ लेव्हल अधिकारी आणि सर्व राजकीय पक्षांकडून १ लाख ३ हजार ७२७ बूथ लेव्हल एजंट नियुक्त करण्यात आले होते, त्यामध्ये २७ हजार ०९९ एजंट हे काँग्रेसनेच नियुक्त केले होते. त्यामुळे महाराष्ट्राच्या मतदार याद्यांबाबत करण्यात आलेले आरोप आधारहीन आहेत. निवडणूक आयोगाने या सर्व तथ्यांची माहिती २४ डिसेंबर २०२४ रोजीच काँग्रेस पक्षाला अधिकृतपणे उत्तराद्वारे दिली होती आणि ही माहिती आयोगाच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहे. या सर्व वस्तुस्थितीकडे दुर्लक्ष करून पुन्हा हे मुद्दे उपस्थित केले जात आहेत, असेही निवडणूक आयोगाने फटकारले आहे.
राहुल गांधी हे जाणीवपूर्वक घटनात्मक संस्थांबद्दल मतदारांमध्ये संशय निर्माण करत असून जॉर्ज सोरोस यांच्या पुस्तकाचा आधार घेत त्यांनी हे आरोप केले आहेत. कर्नाटक, तेलंगणच्या निकालांवर राहुल गांधींनी प्रश्न का नाही विचारला? राहुल गांधींना निवडणूक प्रक्रिया समजते त्यांना कळत नाही असे अजिबात नाही. परंतु त्यांचा हेतू अराजकता पसरविण्याचा आहे.
- अमित मालवीय, भाजपचे नेते आणि आयटी सेलचे प्रमुख
कुणाकडूनच तक्रार नाहीमतदार याद्यांवरून निवडणूक आयोगाने म्हटले, की मतदार याद्या ‘जनप्रतिनिधित्व कायदा-१९५०’ आणि ‘मतदार नोंदणी नियम-१९६०’ नुसार तयार केल्या जातात. कायद्यानुसार निवडणुकीपूर्वी किंवा दरवर्षी विशेष संक्षिप्त फेरनिरीक्षण केले जाते आणि त्याची अंतिम प्रत सर्व राष्ट्रीय तसेच राज्य पातळीवरील राजकीय पक्षांना प्रदान केली जाते. काँग्रेसचाही यात समावेश आहे. अंतिम मतदार याद्या प्रसिद्ध झाल्यानंतर काँग्रेस किंवा इतर कोणत्याही पक्षाकडून कोणतीही ठोस तक्रार निवडणुकांच्या अगोदर करण्यात आली नव्हती, हे लक्षात घ्यावे.
प्रिय निवडणूक आयोग, आपण एक घटनात्मक संस्था आहात. दिशाभूल करणारी पत्रके मध्यस्थांमार्फत प्रसिद्ध करणे हे गंभीर प्रश्नांना उत्तर देण्याचा योग्य मार्ग नाही. आपल्याकडे लपविण्यासारखे काहीच नसेल तर माझ्या लेखातील प्रश्नांना सपष्टपणे उत्तर द्या. सर्व राज्यांतील, महाराष्ट्रासह, नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा आणि विधानसभांच्या निवडणुकांसाठी एकत्रित, डिजिटल, मशीन-रिडेबल मतदार यादी प्रकाशित करा. महाराष्ट्रातील मतदान केंद्रांमधील सायंकाळी पाचनंतरचे सर्व सीसीटीव्ही फुटेज सार्वजनिक करावे. टाळाटाळ करून आपली विश्वासार्हता वाचणार नाही.
- राहुल गांधी, विरोधी पक्ष नेते
रोज खोटे बोलले की एक दिवस ते खरे वाटायला लागते. राहुल गांधी नेमके हेच करीत आहेत. ते जोपर्यंत खोटे बोलणे सोडणार नाही, तोपर्यंत कधीच जिंकणार नाही. ते जे काही बोलतात ते त्यांनाही माहिती नसते. ऐकणाऱ्यालाही समजत नाही त्यावर मी काय प्रतिक्रिया देणार, ते नेहमीच खोटे बोलत असतात, मतदारांचा अपमान करतात. निवडणूक आयोगाने आकडेवारीसह उत्तर दिले आहे तरीही त्यांची खोटे बोलण्याची सवय जात नाही.
- देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री
महाराष्ट्रातील हे सरकार जनमताच्या आधारावर आलेले नसून त्यांनी फसवणूक केली आहे. निवडणूक आयुक्त आणि तत्कालीन सरकारने मॅच फिक्सिंग करून यंत्रांचा गैरवापर करून ही निवडणूक जिंकण्यात आली. राहुल गांधी यांनी सत्य मांडले. मतदानाची आकडेवारी अचानक कशी काय वाढू शकते, याचे गौडबंगाल अद्याप कुणालाच समजलेले नाही.
- विजय वडेट्टीवार, काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते