पाऊस हा शब्द असा आहे ना, की अनेक शब्दांशी त्याचं अतूट नातं आहे. पाऊस म्हटल्यावर ढग, मोर, सरी, छत्री, प्रेम, कविता, चहा... अशा कितीतरी गोष्टी आठवायला लागतात. वयाच्या प्रत्येक टप्प्यावर हा पाऊस वेगळा दिसतो. त्यामुळेच ‘पावसाळे पाहणे’ या गोष्टीला आपण महत्त्व देतो...
आर्य पहिली दुसरीतच असेल आणि नुकताच पाऊस सुरू झाला होता. असाच एकदा पाऊस पडायला लागल्यावर तो म्हणाला, ‘‘आई, कांदाभजी करशील?’’ पहिला पाऊस पडला, तेव्हा केलीच होती. म्हणून मी म्हणाले, ‘‘नाही हं, मी नाही कांदाभजी करणार!’’ यावर त्याचा अनपेक्षित पुढचा प्रश्न ‘‘मग कोणती भजी करशील?’’ मला हसू आवरेना, म्हणजे कुठलीतरी भजी करायची हे त्याने ठरवलं होतंच; पण मी नाही म्हणेन, म्हणून त्याने कांद्याचा उल्लेख आधीच केला होता की काय? पण नाही. त्याच्या चेहऱ्यावर अर्थात अगदी निरागस भाव होते. आणि ते पाहून भजी करणं तर भाग होतंच. आजही पाऊस आणि भजी हे लाडकं समीकरण आहे त्याच्यासाठी!
एखादा शब्द दिला, की तुम्हाला पटकन काय आठवेल त्या खेळाची आता आठवण झाली; पण पाऊस हा शब्द असा आहे ना, की अनेक शब्दांशी त्याचं अतूट नातं आहे. जसं, पाऊस म्हटल्यावर ढग, मोर, सरी, छत्री, प्रेम, कविता, चहा... अशा कितीतरी गोष्टी आठवायला लागतात. शिवाय, वयाच्या प्रत्येक टप्प्यावर हा पाऊस किती वेगळा दिसतो. त्यामुळेच ‘पावसाळे पाहणे’ या गोष्टीला आपण महत्त्व देतो.
लहानपणीचा पाऊस आठवतोय मला. कागदाच्या होड्या सोडण्याचाही अनुभव घेतला होता आणि क्वचित गारा वेचण्याचासुद्धा. पाऊस आणि शाळा एकदमच सुरू व्हायचे. मग वह्या-पुस्तकांबरोबर रेनकोट आणि पावसाळी चपला ही खरेदी ठरलेली. दप्तरही वाॅटरप्रूफ वगैरे. मला या निमित्ताने एक वेगळीच आठवण झाली. पावसाळ्यात आई-बाबांच्या गाडीवरून रेनकोट घालून शाळेत जायचे मी. तेव्हा दांडेकर पुलाजवळून चालत शाळेत जाणारी मुलं दिसायची. त्यांचं कापडी आणि खाकी रंगाचं दप्तर आणि पाऊस लागू नये म्हणून चक्क नायलाॅनचं पोतं किंवा प्लॅस्टिकची खूप मोठी पिशवी डोक्यावर घेऊन, त्यानेच दप्तर झाकून ही मुलं चालायची. खरंच पावसातलं बालपणही किती वेगवेगळं असू शकतं; पण चेहऱ्यावर आनंद तोच!
तसाच प्रत्येक गावातील पाऊस वेगळा. मंगेश पाडगांवकरांनीही त्यांच्या कवितेतून बालपणीचा पाऊस जपला होता.
वेंगुर्ल्याचा पाऊस कसा
माया करीत यायचा
सरींनी लाड करीत
मला जवळ घ्यायचा
पाऊस आला, की कविमनाला कविता सुचली नाही, तरच नवल! नलेश पाटील काय सुंदर शब्दचित्र रंगवतात
येता पाऊस पाहुणा आलं हिरवं उधाण
डोंगरातून फुटलं हिरवळीचं धरण
आणि खरोखरीच कसं काय माहीत नाही; पण त्या-त्या ऋतूत ठरावीक गोष्टी आपोआपच कराव्याशा वाटतात खरं. जसं उन्हाळ्यात वाळ्याचं अत्तर मन प्रसन्न करतं, त्याप्रमाणे पाऊस आला की अशा कवितांसारखीच मल्हाराची सोबतही किती सुंदर वाटते! मग खिडकी किंवा गॅलरीतून दिसणारा पाऊस असो वा गाडीच्या काचेतून दिसणारा! अशा पावसात चहाचा आस्वाद घेत मल्हार ऐकत रमून जावं. ऋतू बदलतात, तशी गाण्याची प्लेलिस्टही बदलत राहते खरंच.
तानसेनने मल्हार आळवल्यावर पाऊस यायचा हेसुद्धा ऐकलं आहेच; मात्र भूलोकीचा गंधर्व अर्थात कोकीळ तो मात्र या काळात चक्क मौनव्रतच धारण करतो आणि गाणं सुरू होतं ते बेडकांचं! आता याही गोष्टीची सुभाषितकार काय कमाल सांगड घालतात पाहा. बेडकांचं गाणं सुरू होतं, म्हणूनच म्हणे कोकीळ तोंडाला कुलूप लावतो. याचं असं कारणही दिल्यावर त्यातून शिकवणही देतात आणि म्हणतात - बेडकांचं असं बरळणं सुरू झाल्यावर मौनच शोभून दिसतं! थोडक्यात मूर्ख बोलू लागल्यावर गप्प बसण्यातच शहाणपण असतं. त्यामुळेच बेडकांची मैफल रंगत जाते. ते सुभाषित असं-
भद्र कृतं कृतं मौनं कोकिलैर्जलदागमे।
दर्दुरा यत्र वक्तारः तत्र मौनं हि शोभनम्॥
अर्थात थेंबांची टपटप, सरींची रिमझिम अशीही पावसाची खास गाणी असतातच. आणि हो ‘पाऊस’ हा विषय घेऊन कार्यक्रम झाला नाही, असा एकही पावसाळा नसेल. इतकी गाणी आहेत पावसाची. त्यात पाऊस आणि प्रेम, पाऊस आणि विरह याबद्दल तर लिहावं तितकं कमीच.
दर पावसाळ्यात कविता सुचण्याचा अनुभव मलाही येतोच. त्यातलीच ही एक लहानशी -
पावसामध्ये भिजताना तुझ्या आठवणी
वाहून गेल्या असत्या, तर किती बरं झालं असतं...
पण गारांसारख्या गोळा करत राहिले
आणि काळजाचं पाणी पाणी झालं!
ही कविता वाचते, तेव्हा दरवेळी माझं मलाच आश्चर्य वाटतं, की या कवितेत ही अशी छटा का उमटावी? एकतर गारा वेचण्याचा अनुभव मी फार क्वचित घेतलाय आणि मला तर तो फार आनंददायी वाटतो. अलीकडेच नेपाळमध्ये भरउन्हात फिरून आल्यावर गाढ झोप लागली आणि कसल्याशा आवाजाने जाग आली. काचेवर छोटे दगड आपटल्याचा भास झाला. मग जाग आल्यावर कळलं, की मुसळधार पाऊस पडतोय आणि हा तर गारांचा आवाज आहे! मी अक्षरशः लहान मुलीसारखी आवारात धाव घेतली.
या गारा सटासटा आल्या चटाचटा
पट् पट् पट् वेचूनिया ओंजळीत घेऊ
हा अनुभव अनेक वर्षांनी नव्याने घेतला. तर यंदाचा पहिला पाऊस तोही गारांचा असा नेपाळमध्ये साजरा केला. ही आठवण तर न विसरता येणारी. वळवाचा पाऊस, पहिला पाऊस, आषाढाचा आणि श्रावणाचा पाऊस प्रत्येक पावसाचं रूप वेगळं!
आषाढाच्या पहिल्याच दिवशी दिसलेल्या मेघाची दूत म्हणून नेमणूक करून आपल्या प्रिय पत्नीला निरोप धाडणारा, विरहाने होरपळणारा यक्ष! अर्थात कालिदासाची ही ‘मेघदूत’ नावाची अजरामर कलाकृती दरवर्षी आठवल्याशिवाय राहत नाही. या खंडकाव्यातील ‘आषाढस्य प्रथम दिवसे’ या शब्दांमुळे आणि कालिदासांची नेमकी जन्मतिथी उपलब्ध नसल्याने तोच दिवस आपण ‘कालिदास जयंती’ म्हणून साजरा करतो.
त्याशिवाय याच महिन्यात असलेल्या पंढरीच्या वारीमुळे तर सावळ्या मेघातही विठ्ठलाचे दर्शन होऊ लागतं. वारीचं प्रतिबिंबच जणू सृष्टीतही पडतं आणि गीतकार गंगाधर महांबरे यांचे शब्द आठवतात,
बिजलीचा टाळ, नभाचा मृदंग
तुझ्या कीर्तनाला देवा, धरती होई दंग
आषाढ सरून श्रावण आला, की कॅलिडोस्कोप फिरावा, तसं चित्रही पालटतं. आणि ‘रिमझिम रेशीमधारा’ सुखावू लागतात. आकाशातील सप्तरंग आणि त्याला सणांचा संग! श्रावण हा असा सर्वार्थाने सोहळाच असतो.
पण मुळात पाऊस साजरा करण्यासाठी तो यायलाही हवा, तोही हवा तेव्हाच आणि हवा तेवढाच! खूप जास्त झाला, तर ‘नको नको रे पावसा’ म्हणण्याची वेळ येते. याउलट फिरकलाच नाही, तर आपण सगळेच चातक होऊन जातो. अशीच एक छोटी कथा आठवली-
एकदा एका गावात दुष्काळ पडला. तेव्हा पाऊस येण्याकरिता मोठा यज्ञ करण्यात आला. त्यावेळेस फक्त एक लहान मुलगीच तेवढी छत्री घेऊन गेली होती. तिला ‘छत्री का आणलीस?’ असं विचारल्यावर ती म्हणाली, ‘‘यज्ञ संपल्यावर पाऊस पडेल, तेव्हा वापरायला!’’ श्रद्धा म्हणतात ती हीच. पाऊस पडणार ही खात्री तिला एकटीलाच होती. आपण निसर्गातील सर्व गोष्टीत देव पाहतोच. त्यामुळेच पर्जन्यदेवतेची सूक्त तर आहेतच; पण आधी म्हटलं तसं, प्रत्येक पावसात आपल्याही मनात काही उमटतंच. तशीच अलीकडेच पावसाचीही आरती करावीशी वाटली. त्याची कृपा तर हवीच. त्याच काही ओळींनी लेखाची सांगता करते-
पालनकर्ता पोषणकर्ता वार्ता येण्याची
सर्वांवर सदैव कृपा हो त्याची
आभाळ भरले दाटी मेघांची
कंठी झळके माळ थेंबाथेंबांची
जय देव जय देव जय पाऊसदेवा
आम्हावर सदैव कृपा ही ठेवा!
(लेखिका निवेदिका आणि
व्याख्यात्या आहेत.)