इंग्लंड विरुद्ध टीम इंडिया यांच्यातील 5 कसोटी सामन्यांच्या मालिकेतील सलामीचा सामना हेडिंग्ले लीड्समध्ये खेळवण्यात येत आहे. आतापर्यंत या सामन्यात 3 दिवसांचा खेळ झाला आहे. दोन्ही संघ तिसऱ्या दिवसानंतर सामन्यात बरोबरीत आहेत. टीम इंडियाने तिसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत 2 विकेट्स गमावून 90 धावा केल्या आहेत. टीम इंडियाने अशाप्रकारे एकूण 96 धावांची आघाडी मिळवली आहे. केएल राहुल 47 धावांवर नाबाद आहे. तर कर्णधार शुबमन गिल 6 धावा करुन मैदानात आहे. केएलने या खेळी दरम्यान खास कामगिरी केली. केएलने कसोटी क्रिकेटमध्ये इंग्लंड विरुद्ध 1 हजार धावा पूर्ण केल्या.
केएल राहुल याने कायमच इंग्लंड विरुद्ध दमदार कामगिरी केली आहे. केएलने इंग्लंड विरुद्ध 14 सामन्यांमध्ये 26 डावांमध्ये 41 च्या सरासरीने 1 हजार 44 धावा केल्या आहेत. केएलने इंग्लंड विरुद्ध कसोटीत 3 शतकं तर 2 अर्धशतक झळकावली आहेत. तसेच केएल इंग्लंड विरुद्ध कसोटीत 1 हजार धावा करणारा 17 वा भारतीय फलंदाज ठरला आहे. तसेच केएलची ही कोणत्या एका संघाविरुद्ध 1 हजार धावा करण्याची पहिलीच वेळ ठरली आहे. केएलने इंग्लंडनंतर कसोटीत ऑस्ट्रेलिया विरुद्ध सर्वाधिक धावा केल्या आहेत.
लीड्समध्ये तिसऱ्या दिवशी टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह याने शानदार कामगिरी केली. बुमराहने 83 धावांच्या मोबदल्यात 5 विकेट्स घेतल्या. बुमराहने घेतलेल्या या 5 विकेट्समुळे टीम इंडिया इंग्लंडला आघाडी घेण्यापासून रोखण्यात यशस्वी ठरली. इंग्लंडला भारताच्या 471 च्या प्रत्युत्तरात 465 धावांपर्यंतच पोहचता आलं. त्यामुळे टीम इंडियाला नाममात्र का होईना पण 6 धावांची आघाडी मिळाली. इंग्लंडकडून ओली पोप याने सर्वाधिक 106 रन्स केल्या. तर हॅरी ब्रूक याने 99 धावा केल्या. तर टीम इंडियाने तिसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत 2 विकेट्स गमावून 90 धाला केल्या. भारताने अशाप्रकारे एकूण 96 धावांची आघाडी घेतली.
केएलच्या इंग्लंड विरुद्ध 1 हजार धावा
भारताने दुसऱ्या डावात यशस्वी जैस्वाल आणि साई सुदर्शन या दोघांच्या रुपात विकेट्स गमावल्या. पहिल्या डावात शतक करणारा यशस्वी दुसऱ्या डावात मोठी खेळी करु शकला नाही. यशस्वी दुहेरी आकडाही गाठू शकला नाही. यशस्वीने 11 चेंडूत 4 धावा केल्या. तर पदार्पणातील पहिल्या डावात झिरोवर आऊट होणाऱ्या साई सुदर्शन याने दुसऱ्या डावात खातं उघडलं. साईने केएलसोबत दुसऱ्या विकेटसाठी 66 रन्सची पार्टनरशीप केली. त्यानतंर साई 48 बॉलमध्ये 4 फोरसह 30 रन्स करुन आऊट झाला. त्यामुळे केएल आणि शुबमनवर भारताला मोठी आघाडी मिळवून देण्याची जबाबदारी असणार आहे.