पुण्यात मावळ तालुक्यात कुंडमळा याठिकाणी इंद्रायणी नदीवरचा नदीवरचा पूल कोसळल्यानं मोठी दुर्घटना घडल्याची माहिती समोर येत आहे.
या दुर्घटनेत 12 पर्यटक जखमी असल्याची माहिती पिंपरी चिंचवड पोलिसांकडून मिळाली आहे. या दुर्घटनेत काही लोक वाहून गेले असल्याची शक्यताही व्यक्त करण्यात येत आहे, असे पोलीस निरीक्षक रंजीत जाधव (तळेगाव MIDC ) असे सांगितले आहे.
ही घटना घडली तेव्हा किती लोक या पुलावर होते आणि किती वाहून गेले याबाबत खात्रीशीर माहिती अद्याप मिळालेली नाही, पण बचावकार्य सुरू असल्याचे अधिकाऱ्यांनी प्रतिनिधींना सांगितले आहे.
घटनास्थळावर बचकपथ पोहचले असून बचावाचे कार्य प्रगतीपथावर आहे.
कुंडमळा हे या परिसरातील एक पर्यटनस्थळ आहे. त्यामुळं आठवड्याच्या अखेरीस याठिकाणी पर्यटकांची गर्दी होत असते. आज रविवार असल्यामुळं याठिकाणी गर्दी असण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी याबाबत मदतकार्य वेगानं सुरू आहे, असं सांगितलं.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांना सांगितले की सध्या बचावकार्य सुरू आहे. NDRF चे पथक घटनास्थळी रवाना झाल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
शिवसेना ( UBT) च्या नेत्या सुषमा अंधारे यांनी सांगितले, "इंद्रायणी नदीवरील पूल पडण्याची घटना अत्यंत दुर्दैवी आहे. मात्र ही घटना का घडली याचा शोध घेतला असता, कुंडमळा परिसरातील इंद्रायणीवरचा पूल किंवा एकूणच राज्यातील वेगवेगळ्या नद्यांवर असणारे पूल यांच्या संबंधाने आवश्यक असणारी कामे पावसाळ्याआधी होणे अधिक गरजेचे आहे. अशा मोडकळीस आलेल्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट शासनाकडून होणे गरजेचे आहे. मात्र या पुलाच्या बाबतीत अशी कुठलीही खबरदारी घेतलेली नव्हती.
वारंवार ग्रामस्थांनी नवीन पुलाची मागणी केलेली असताना आणि पर्यायी रस्ता उपलब्ध नसताना सुद्धा स्थानिक लोकप्रतिनिधीनी या गोष्टीकडे अक्षम्य दुर्लक्ष केले त्यामुळे या दुर्घटनेला सरकारच जबाबदार असल्याचे अंधारे यांनी म्हटले आहे.
बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.