पुण्यात मावळ तालुक्यातल्या कुंडमळा याठिकाणी एका पर्यटन स्थळी अत्यंत दुर्दैवी दुर्घटना घडली आहे.
याठिकाणी इंद्रायणी नदीवर असलेला जुना लोखंडी पूल कोसळल्यामुळं त्यावरील पर्यटक खाली पडून काही नदीच्या प्रवाहात वाहून गेले आहेत.
या दुर्घटनेत आतापर्यंत दोघांचा मृत्यू झाला असल्याची माहिती समोर आली आहे. मुख्यमंत्र्यांनी केलेल्या सोशल मीडिया पोस्टनुसार यात 2 ठार झाले असून 32 जखमी आहेत.
जखमींपैकी 6 जणांची प्रकृती गंभीर आहे, असंही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक्सवर केलेल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.
दरम्यान, राष्ट्रीय आपत्ती निवारण पथकाने (NDRF) म्हटले आहे की, आतापर्यंत 38 जणांना वाचवण्यात पथकाला यश मिळाले आहे आणि बचावकार्य अद्याप सुरू आहे.
पुण्यात पिंपरी चिंचवडमध्ये कुंडमळा परिसरातून वाहणाऱ्या इंद्रायणी नदीच्या परिसरात पर्यटनस्थळ आहे. पावसाळ्यात प्रसन्न वातावरण असल्यामुळं त्याठिकाणी पर्यटकांची चांगली गर्दी होत असते.
रविवारी सुटीचा दिवस आणि वीकेंड अल्यामुळं याठिकाणी पर्यटकांनी चांगलीच गर्दी केली होती. त्यामुळं हा पूल कोसळला त्यावेळी त्यावर मोठ्या संख्येनं पर्यटक असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
अपघातानंतर स्थानिकांनी तातडीने मदतकार्य करत लोकांना वाचवण्याचे प्रयत्न केले. त्याबरोबरच एनडीआरएफच्या पथकालाही तातडीने पाचारण करण्यात आलं. त्यामुळं अधिकाधिक लोकांना वाचवण्यास मदत झाली.
हा पूल कोसळण्यामागचं नेमकं कारण अद्याप समोर आलेलं नाही.
मात्र, या पुलाची अवस्था जीर्ण झालेली होती असा आरोप काही स्थानिक नेत्यांनी केला आहे. सरकारला याच्या दुरुस्तीसाठी वारंवार विनंती केली होती, असं स्थानिक नेत्यांनी वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितलं.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही हा पूल जीर्ण असल्याची माहिती मिळाल्याचं म्हटलं आहे.
" या पुलाची अवस्था जीर्ण असल्याची प्राथमिक माहिती प्राप्त झाली आहे. त्यामुळे या दुर्घटनेची सखोल चौकशी करण्याचे निर्देश प्रशासनाला देण्यात आले असून, देखभालीबाबत कोणतेही दुर्लक्ष झाल्याचे आढळल्यास संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात येईल," असं त्यांनी म्हटलं आहे.
या पुलावरून दुचाकी वाहनं नेण्यास बंदी असल्याचा फलक लावलेला होता. तरीही यावरून काही लोक दुचाकीनं वाहतूक करत होते, असंही काही स्थानिकांनी सांगितलं आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घटनेनंतर तातडीने संबंधित यंत्रणांकडून याबाबत माहिती घेऊन सर्व यंत्रणांना अलर्ट मोडवर राहण्याचे आदेश दिले आहेत.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही या घटनेबाबत दुःख व्यक्त केले आहे.
मी स्वतः याबाबत पुणे जिल्हाधिकाऱ्यांशी बोललो असून, आवश्यक ती सर्व मदत तात्काळ करण्याचा सूचना त्यांना दिलेल्या आहेत, असं त्यांनी सांगितलं.
शिवसेना ( UBT) च्या नेत्या सुषमा अंधारे यांनी या प्रकरणी सरकारवर टीका केली आहे.
अशा मोडकळीस आलेल्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट शासनाकडून होणे गरजेचे आहे. मात्र या पुलाच्या बाबतीत अशी कुठलीही खबरदारी घेतलेली नव्हती, असं सुषमा अंधारे यांनी म्हटलं आहे.
रोहित पवार, सुप्रिया सुळेही यांनीही तातडीने घटनास्थळी जाऊन परिस्थितीची पाहणी केली.
याठिकाणी मदतकार्य सुरू असतानाच रिमझिम पाऊसही सुरू असल्यानं बचावपथकांना पावसातच मदतकार्य करावं लागलं.
पुलाचं वजन जास्त असून पाण्याचा प्रवाह असल्यामुळंही मदतकार्यात काहीशा अडचणी येत असल्याचं समोर आलं आहे. तसंच काही वेळात अंधार पडल्यानंतर हे आणखी कठीण होण्याची शक्यता आहे.
बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.