संत ज्ञानेश्वर माऊली आणि जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांच्या पालख्या आज पुणे शहरात मुक्कामाला आहेत. यानिमित्त संपूर्ण शहरभर आध्यात्मिक वातावरण आहे.
पुणे जिल्ह्यातील देहूतून संत तुकाराम महाराजांची पालखी तर आळंदीतून संत ज्ञानेश्वरांच्या पालखीचं पंढरपूरकडं प्रस्थान होतं. त्यानंतर राज्यातील इतर अनेक संतांच्या पालख्या या वारीमध्ये सहभागी होतात.
पुणे शहरात पालखीनिमित्त पावसाचं देखील आगमन होत असतं, पण तरीही वारकऱ्यांच्या आणि भाविकांचा उत्साहात तसुभरही फरक पडत नाही.
शहरभर सगळीकडं पांढरी शुभ्र सदरे, पांढऱ्या विजारी आणि धोतरं आणि डोक्यावर गांधी टोप्या घातलेली मंडळी दिसत असल्यानं वारी मार्गावर पांढरी चादर पसरल्यासारखं वाटतं.
पालखी मार्गावर प्रत्येक चौकात भल्या मोठ्या रांगोळ्यांच्या पायघड्या घातलेल्या होत्या. त्यामुळं चांगलीच वातावरण निर्मिती झाली होती.
पालखीच्या दर्शनासाठी शहरात जिल्ह्यातून आलेल्या पुणेकरांनी गर्दी केली होती. भर पावसातही छत्र्या आणि रेनकोट घालून भाविकांनी मनोभावे पालख्यांचं दर्शन घेतलं.
संत तुकाराम महाराजांच्या पालखी रथाला फुलांची आकर्षक आरास करण्यात आली होती. हा रथ पाहून कोणाचंही मन प्रफुल्लित झाल्याशिवाय राहणार नाही.
वारीमध्ये बाल वारकऱ्यांची संख्याही मोठी होती. पालक मंडळी आपल्या चिमुकल्यांना वारकऱ्यांचे वेश धारण करुन पालखी दाखवण्यासाठी घेऊन आले होते.
वारीनिमित्त वारकऱ्यांच्या, भाविकांच्या आणि शहरातील नागरिकांच्या सुरक्षेसाठी आणि त्यांची गैरसोय होऊ नये म्हणून रस्त्यावर उतरलेल्या पोलीस मंडळींचं योगदानही मोठं आहे. असाच ड्युटीवर असलेल्या एका पोलीस अधिकाऱ्याच्या रुपात साक्षात विठ्ठलचं असल्याचा भाव होता.