सध्या उन्हाळा सुरु आहे आणि उन्हाळ्यामध्ये अनेक लोकांना सनबर्नची समस्या होते. सूर्यप्रकाशामुळे तुमच्या त्वचेवर मोठ्या प्रमाणात जळजळ आणि लालसरपणा येतो, याला सनबर्न असे म्हणतात. तसेच वैद्यकीय भाषेत याला सोलर एरिथेमा असे म्हटले जाते. जर तुम्हालाही सनबर्नची समस्या असेल तर आता आयुर्वेदाच्या मदतीने त्यावर उपचार करणे शक्य होणार आहे. पतंजली हर्बल अनुसंधान विभागाने केलेल्या एका संशोधनातून ही माहिती समोर आली आहे. हे संशोधन ‘इंटरनॅशनल जर्नल ऑफ डर्मेटोलॉजी’मध्ये प्रकाशित झाले आहे.
पतंजली हर्बल अनुसंधान विभाग, पतंजली अनुसंधान संस्थान, हरिद्वार यांनी केलेल्या संशोधनानुसार, आयुर्वेदामुळे सनबर्नची लक्षणे कमी होण्यास मदत मिळते. या संशोधनानुसार आयुर्वेदिक आणि हर्बल उपायांनी सोलर एरिथेमा म्हणजेच सनबर्नची लक्षणे कमी करता येतात. कोरफड, लिंबू आणि टोमॅटो यांसारख्या नैसर्गिक घटकांचा वापर त्वचेला आराम देतो. तसेच जळजळ कमी होते. तसेच कोरफडचा वापर एक उत्तम नैसर्गिक मॉइश्चरायझर म्हणून करता येतो. तर टोमॅटोचा रस त्वचेच्या अनेक समस्यांवर गुणकारी ठरतो. यासोबतच काकडी आणि लिंबाचा लेप त्वचेला थंडावा देतो. त्यामुळे सनबर्नची तीव्रता कमी होऊ शकते.
तसेच आयुर्वेदामध्ये पित्त दोषाचे असंतुलन हे सनबर्नसारख्या समस्यांचे मुख्य कारण मानले जाते. पंचकर्म थेरपीच्या मदतीने शरीरातील या दोषांचे संतुलन साधता येते. त्वचेसंबंधी समस्यांवर उपचार करता येतात. स्नेहन, स्वेदन, वमन, विरेचन आणि रक्तमोक्षण यांसारख्या प्रक्रियांमुळे शरीर शुद्ध होते. तसेच त्वचेच्या समस्या कमी होतात.
या संशोधनात असेही सांगितले आहे की काही सनस्क्रीन आरोग्यासाठी धोकादायक असू शकतात. केमिकल बेस्ड सनस्क्रीनमध्ये अनेक रासायनिक घटक असून ते हानिकारक असतात. अमेरिकेच्या अन्न आणि औषध प्रशासनाने (FDA) काही रसायनांना धोकादायक घोषित केले आहे. या संशोधनात काही रसायनांचा उल्लेख करण्यात आला आहे. त्यापैकी होमोसलेट हे एक रसायन सनस्क्रीनमध्ये वापरले जाते. यामुळे हार्मोनल संतुलन बिघडते. तसेच ऑक्सीबेंझोन या सनस्क्रीनमध्ये वापरण्यात येणाऱ्या रसायनामुळे त्वचेला ॲलर्जी निर्माण होऊ शकते.