जम्मू आणि काश्मीरच्या पहलगाममध्ये घडलेल्या दहशतवादी हल्ल्याने संपूर्ण देश हादरला आहे. या हल्ल्यात 28 पर्यटकांचा मृत्यू झाला आणि 20 हून अधिक पर्यटक जखमी झाले आहेत.
या हल्ल्याची जबाबदारी 'द रेसिस्टन्स फ्रंट' (TRF) या लष्कर-ए-तैयबा (LeT) शी संबंधित दहशतवादी संघटनेने स्वीकारली आहे .
खरं तर टीआरएफ (The Resistance Front) ही संघटना थेट लष्कर-ए-तैयबा या पाकिस्तानस्थित दहशतवादी संघटनेशी संबंधित आहे, पण तिचं नाव आणि कामकाज जरा वेगळं ठेवून ही संघटना काश्मीरमध्ये सक्रिय करण्यात आली.
या हल्ल्यामागे पाकिस्तानचा सैफुल्लाह खालिद उर्फ सैफुल्लाह कसूरी हा कुख्यात दहशतवादी आहे. सैफुल्लाह हा लष्कर-ए-तैयबाचा उप प्रमुख आहे, भारतातील अनेक मोठ्या हल्ल्यांमध्ये त्याचा हात होता.
14 फेब्रुवारी 2019 रोजी पुलवामा येथे झालेल्या आत्मघातकी हल्ल्यानंतर, जिथे CRPF चे 40 हून अधिक जवान शहीद झाले होते, त्यानंतर भारतात आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर लष्कर-ए-तैयबा, जैश-ए-मोहम्मद यांच्यावर मोठा दबाव आला.
याच पार्श्वभूमीवर TRF ची संकल्पना उदयास आली — एक "नवीन" चेहरा, जो आधीच्या संघटनांइतका बदनाम नसेल आणि ज्याच्या माध्यमातून पाकिस्तान-समर्थित अतिरेकी कारवाया "स्थानिक जनतेच्या प्रतिकाराचा भाग" असल्याचा आभास निर्माण करता येईल.
2019 मध्ये कलम 370 हटवल्यानंतर, काश्मीरमध्ये मोठ्या प्रमाणावर असंतोष आणि अस्थिरता पसरली . याच असंतोषाचा फायदा घेतला आणि TRF ने सोशल मीडियावरून लोकांना भडकवणे, भरती करणे आणि 'सेलुलर नेटवर्क'द्वारे हल्ल्यांची योजना आखणे यासारख्या पद्धती वापरल्या.
TRF च्या मोहिमांमध्ये लक्षवेधी गोष्ट म्हणजे "हायब्रीड अतिरेकी" — म्हणजे दहशतवादी जे पूर्णवेळ अतिरेकी नसतात, पण गरज पडल्यावर हल्ले करून पुन्हा सामान्य आयुष्य जगतात.
TRF स्वतःला "कश्मीरी जनतेचा आवाज" म्हणवते, आणि भारत सरकारवर लोकसंख्यात्मक बदल, जबरदस्तीने कब्जा, आणि मानवी हक्कांचं उल्लंघन केल्याचा आरोप करते.
मात्र वास्तवात, ही संघटना पूर्णपणे पाकिस्तान-समर्थित आणि प्रशिक्षित असून, तिचं मुख्य उद्दिष्ट म्हणजे काश्मीरमध्ये अस्थिरता पसरवणे हेच आहे.