पुणे - ‘पाकिस्तानचे जे नागरिक व्हिसा घेऊन महाराष्ट्रात आले आहेत, त्यांची सर्व माहिती राज्य सरकारकडे उपलब्ध आहे. त्यांची ओळख पटलेली आहे. त्यांना नोटिसा देऊन परत पाठविण्याची व्यवस्था झालेली आहे. त्यामुळे त्यांना ४८ तासांत बाहेर काढू. त्यावर पोलिस व्यवस्थित काम करत आहेत,’ असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
तसेच ‘‘कोणी पाकिस्तानी जर अवैधरीत्या आला असेल, तर त्यालाही शोधण्याची प्रक्रिया निरंतर सुरू राहणार आहे,’ असेही फडणवीस यांनी सांगितले. ग्रामविकास विभागाच्या वतीने आयोजित दोन दिवसीय राज्यस्तरीय कार्यशाळेप्रसंगी मुख्यमंत्री फडणवीस शनिवारी पुण्यात आले होते. तेव्हा त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
ज्या प्रमाणात अवैध वास्तव्य करणारे बांगलादेशी आढळतात, त्या प्रमाणात अवैध पाकिस्तानी आढळत नाहीत. त्यामुळे पहिल्यांदा प्राधान्य हे व्हिसा घेऊन आलेल्या नागरिकांना बाहेर काढण्यावर आहे, असे ते या वेळी म्हणाले.
पाकिस्तानमधील काही जण भारतात उपचार घेण्यासाठी आल्याच्या प्रश्नावर फडणवीस म्हणाले, ‘ज्याप्रकारे आपण सर्वांना बाहेर जाण्यास सांगितले आहे, तसेच पाकिस्ताननेही तेच केले आहे. मानवतेच्या दृष्टिकोनातून आपली सहानुभूती असतेच; पण शेवटी देशाच्या सुरक्षिततेचा आणि अस्मितेचा विषय येतो, त्या वेळी काही कडक निर्णय घ्यावे लागतात.
पाकिस्तानच्या सरकारला समजले पाहिजे की, त्यांची निर्भरता भारतावर आहे. दहशतवादाला ते समर्थन देतात. आज जगातील कोणताही देश पाकिस्तानसोबत उभा राहू शकत नाही, ही पाकिस्तानची परिस्थिती आहे. तसेच पाकिस्तानकडे खायला पैसे नाहीत. नागरिक भुकेने मरत आहेत.
पाणी अडवण्यास भारताने सुरू केली तर पाकिस्तानला तहानेने मरण्याची वेळ येईल. हा अतिशय योग्य निर्णय आहे. अशा प्रकारची जागा दाखवावी लागते. काही लोक आपल्याकडे असे आहेत की त्यांना प्रत्येक गोष्टीत प्रश्नचिन्ह निर्माण करायचे आहे. त्यांना देशाच्याप्रती काहीच वाटत नाही. मला अशा लोकांची किव येते.’
तर १०० वर्षे मुख्यमंत्री राहीन
तुम्ही २०३४ पर्यंत मुख्यमंत्री राहाल, असे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले होते. यावर फडणवीस म्हणाले, ‘बावनकुळे यांच्या मनात आले तर मला शंभर वर्षे ठेवतील. त्यांच्या शुभेच्छांमधील मथितार्थ समजून घ्या. ते माझ्या चांगल्यासाठी आहेत. राजकारणात भूमिका बदलत असतात. त्या बदलल्याही पाहिजेत. कोणी दीर्घकाळ राहत नाही. त्यामुळे जेव्हा माझी भूमिका बदलायची, तेव्हा ती बदलेल.’
राज्य सरकार मदत करणार
जगदाळे आणि गनबोटे यांच्या परिवाराचे अनुभव ऐकल्यानंतर दहशतवादाशी लढण्याचा निर्धार अधिक मजबूत झाला आहे. या परिवारांना जी काही मदत लागेल ती राज्य सरकार निश्चित करेल,’ असे फडणवीस यांनी सांगितले.
असे चालणार नाही...
बुलडाण्याचे शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी पोलिसांविषयी केलेल्या वक्तव्यावर फडणवीस म्हणाले, ‘पोलिसांबद्दल असे बोलणे योग्य नाही. त्यांना कडक समज द्या, असे मी उपमुख्यमंत्री शिंदे यांना सांगितले आहे. असे प्रकार चालणार नाहीत. वारंवार ते असे बोलत असतील तर त्यावर कारवाई केली जाईल.’