संजय राठोड, साम टीव्ही
यवतमाळच्या मारेगाव येथून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. मारेगाव येथे राहणाऱ्या आणि अभियंता पदावर कार्यरत असलेल्या उच्चशिक्षित युवतीने घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली. युवतीचा विवाह ठरला होता. मात्र, काही कारणास्तव तरूणीचा विवाह मोडला. लग्न मोडल्याचा धक्का तरूणीला सहन झाला नाही. याच तणावातून तिने आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलले असावे, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
(वय वर्ष २७) असे मृत तरूणीचे नाव आहे. दिक्षाने अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण केले होते आणि सध्या छत्रपती संभाजीनगर येथील एका खाजगी कंपनीत ‘वर्क फ्रॉम होम’च्या माध्यमातून काम करत होती. मिळालेल्या माहितीनुसार, काही दिवसांपूर्वी दिक्षाचे एका तरूणासोबत लग्न ठरले होते.
लग्न ठरल्यानंतर त्यांचा साखरपुडाही पार पडला होता. मात्र, काही कारणास्तव त्यांचे लग्न मोडले. गेल्या काही दिवसांपासून लग्न मोडले म्हणून ती नैराश्यात होती. याच तणावातून तिने घरातच गळफास घेत आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून, त्यांनी मृतदेह रूग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवले आहे.
दिक्षाच्या पश्चात तिची आई, सेवानिवृत्त वडील आणि धाकटी बहीण असा परिवार आहे. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे. तिने टोकाचं पाऊल उचलण्यामागचं कारण काय? याचा शोध पोलीस घेत आहेत.