Congress : मुंबई : ज्यांची जेवढी लोकसंख्या तेवढी भागीदारी या तत्त्वानुसार राहुल गांधी यांनी जातनिहाय जनगणनेची आग्रही मागणी केली होती. जातनिहाय जनगणनेनंतर सर्वच समाज घटकांच्या आरक्षणाचा प्रश्न सुटू शकतो. त्यामुळे सरकारने जनगणनेचा कालबद्ध कार्यक्रम जाहीर करून तेलंगणा तसेच कर्नाटक पॅटर्न राबवावा, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला आहे. भाजपाने सातत्याने या मागणीला विरोध केला पण नाईलाजाने भाजपा सरकारने ती मान्य केली, अशी टीका देखील त्यांनी यावेळी केली. (caste-wise census will solve the issue of Maratha reservation, said the Congress state president)
टिळक भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, जातनिहाय जनगणना ही केवळ शिरगणती नाही तर सामाजिक अजेंडा आहे. महाराष्ट्रात ओबीसींची संख्या 27 वरून वाढून 64 टक्क्यापर्यंत जाऊ शकते. शिवाय, या जनगणनेमुळे प्रत्येक समाज घटकांची लोकसंख्या किती हेही समजेल, पाटीदार, गुर्जर, मराठा आरक्षणाचा प्रश्नही यामुळे सुटण्यास मदत होईल, असा दावाही त्यांनी केला. भाजपा सरकारला जातनिहाय जनगणनेचा निर्णय घ्यावा लागला याचे सर्व श्रेय राहुल गांधी यांना जाते, त्यांनी या मागणीचा सातत्याने पाठपुरावा केला त्यामुळे मोदी सरकारला निर्णय घ्यावा लागला. सरकारने याची प्रक्रिया काय आहे? माहिती कशी जमा करायची? याचे प्रशिक्षण कर्मचारी तसेच अधिकारी यांना दिले पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली.
लोकसभेतील विरोध पक्षनेते राहुल गांधी बिहारमध्ये ‘पलायन रोको नोकरी दो’ अभियानासाठी जात असताना त्यांचा तोफा पोलिसांनी अडवला यातून सत्तेचा माज दिसतो आहे. विद्यार्थ्यांशी संवाद साधण्यास जाण्यात काय गुन्हा आहे? पण भाजपा आघाडीचे सरकार लोकशाही मानत नाही. हा तानाशाहीचा प्रकार असून मूलभूत अधिकारांवर घाला घालणारा आहे. काँग्रेस पक्ष याचा निषेध करत आहे.
कर्नल सोफिया यांच्याबद्दल अत्यंत घाणेरडी भाषा वापरणारा भाजपाचे मध्य प्रदेशातील मंत्री विजय शाह यांना भाजपाने मंत्रीपदावरून तसेच पक्षातून तात्काळ हाकलून दिले पाहिजे. पण भाजपाचे केंद्रीय नेतृत्वही त्यांना पाठीशी घालत आहे असे दिसते. उच्च न्यायालयाने त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे निर्देश दिले असताना विजय शाह निर्लज्जपणे सुप्रीम कोर्टात जातात. पण सर्वोच्च न्यायालयानेही त्यांना फटकारले आहे. हा देशाच्या सन्मानाचा प्रश्न आहे, त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा तसेच त्यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करावी अशी मागणी हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे.