कात्रज : 'पवार साहेबांमुळे महाराष्ट्रात महिला आरक्षणाची सुरवात झाली. महिलांना सुरवातीला राजकारणात ३३ टक्के आरक्षण दिले. राष्ट्रशक्ती प्रतिष्ठान आणि यशवंत क्लासेसतर्फे जागतिक मातृदिनानिमित्त मातृनाम प्रथम या कार्यक्रमाचे आयोजन सातारा रस्त्यावरील आण्णाभाऊ साठे सभागृहात ते बोलत होते.
यावेळी आमदार भीमराव तापकीर, माजी महापौर दत्ता धनकवडे, माजी नगरसेवक प्रकाश कदम, युवराज बेलदरे, वर्षा तापकीर, राणी भोसले, अश्विनी भागवत, योगेश शेलार, शितल पाटील, उज्वला पाटील, हर्षवर्धन पाटील उपस्थित होते.
पवार म्हणाले, महिला जर चूल आणि मूल घर संभाळू शकते तर ती स्त्री गाव, नगरपरिषद, पालिकाही संभाळू शकते असा विश्वास आम्हाला होता. शरद पवार साहेब महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते त्यावेळी राज्याच्या विधिमंडळात आरक्षणाचे बिल आणले.
त्यांनी सांगितलं होतं की, हे बिल मंजूर झाल्याशिवाय सभागृहाचे कामकाज थांबणार नाही आणि सभागृह सकाळी चार वाजेपर्यंत चालवून महिला आरक्षणाचे बिल पास करून घेतले. आपला महाराष्ट्र हा खऱ्या अर्थाने मातृप्रथमराष्ट्र आहे. त्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांचे उदाहरण महत्वाचे आहे त्यांना जिजाऊंनी घडविले.
मुलांवर लहानपणांपासून संस्कार झालेच पाहिजेत. पण, अनेकांची मुलं, सून मुली, जावई परदेशात आहेत. दुर्दैवाने हे लोक आपल्या आई-वडिलांना विसरून जातात. मुलींना पूर्वी शिकण्याचा अधिकार नव्हता त्यावेळी याच पुण्यात महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी मुलींची पहिली शाळा सुरू केली मुलींची शिक्षणाची सोय केली आणि तिथून सुरू झालेला प्रवास इथपर्यंत पोहोचला आहे.
पहेलगाममध्ये अतिरेक्यांनी अनेकांना मारलं, पण याचा बदला घेतला पाहिजे आणि मास्टरमाईंड शोधून त्यांना संपवलं पाहिजे अशी भावना आपली होती, आणि त्यावेळी भारत पाकिस्तानमध्ये युद्ध झालं आपण सगळेजण देशाचे मनोधैर्य वाढवण्याचे काम करत होतो. त्याहीवेळी दोन महिलांनी माध्यमांसमोर येऊन माहिती दिली, असेही पवारांनी सांगितले.
यावेळी तापकीर यांनीही मनोगत व्यक्त केले. तर, अभिनेता संकर्षण कऱ्हाडेने आई हॉर्ट टू हार्ट मातृनाम प्रथम या संकल्पनेतून विद्यार्थ्यांना आई-वडील किती महत्वाचे आहेत हे योग्य वयात समजणार असल्याचे सांगितले. यावेळी त्यांनी कविताही सादर करत उपस्थितांची मने जिंकली. मातृनाम प्रथम ही संकल्पना असलेली प्रतिमा आयोजकांच्या वतीने मान्यवरांना भेट देण्यात आली. यशवंत क्लासेसचे संचालक शितल आदगौडा पाटील यांनी प्रस्ताविक केले तर माजी महापौर दत्तात्रेय धनकवडे यांनी आभार मानले.