ठाणे : ठाण्यात राहणाऱ्या नागरिकांसाठी महत्वाची बातमी हाती आली आहे. ठाण्याच्या महापालिका क्षेत्रात राहणाऱ्यांना पाणी जपून वापरावे लागणार आहे. ठाणे महानगरपालिकेच्या जलशुद्धीकरण केंद्रात पावसाळापूर्व आवश्यक देखभाल-दुरुस्ती दुरुस्तीचे कामकाज हाती घेण्यात येणार आहे. यामुळे ठाण्यातील काही भागात बुधवारी पाणीपुरवठा बंद राहणार आहे. यामुळे नागरिकांना पुढील काही दिवस पाणी जपून वापरावे लागणार आहे. (Thane Water supply)
पाणीपुरवठा कधी राहणार बंद?ठाणे महानगरपालिकेच्या स्वत:च्या पाणी पुरवठा योजनेतील पिसे उदंचन केंद्र आणि टेमघर जलशुद्धीकरण केंद्र येथील उच्च दाब उप केंद्रातील पावसाळापूर्व आवश्यक देखभाल-दुरुस्ती, कंट्रोल पॅनलची दुरुस्ती, ट्रान्सफॉर्मर ऑईल फिल्ट्रेशन आदी अत्यावश्यक कामे करण्यात येणार आहेत. त्यामुळे बुधवारी सकाळी ९.०० वाजल्यापासून रात्री ०९.०० वाजेपर्यंत एकूण १२ तासांसाठी पाणी पुरवठा बंद राहणार आहे.
कमी दाबाने होणार पाणीपुरवठादेखभाल-दुरुस्तीच्या कामामुळे महानगरपालिका क्षेत्रात, घोडबंदर रोड, वर्तक नगर, ऋतू पार्क, जेल, गांधी नगर, रुस्तमजी, सिद्धांचल, समता नगर, इंटरनिटी, जॉन्सन आणि कळव्याचा काही भाग येथील पाणी पुरवठा १२ तासांसाठी पूर्णपणे बंद राहील. पाणीपुरवठा (Water Supply) सुरू झाल्यानंतर पुढील १ ते २ दिवस कमी दाबाने पाणी पुरवठा होणार आहे.
पाणी उपसा करणारी जलवाहिनी फुटली होतीदरम्यान, काही दिवसांपूर्वी उल्हास नदीतून एमआयडीसीच्या जलशुद्धीकरण केंद्रासाठी पाणी उपसा करणारी जलवाहिनी फुटली होती. त्यामुळे पाणीपुरवठा खंडित झाला होता. या जलवाहिनीच्या दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर हाती घेण्यात आले होते. यामुळे २४ तास एमआयडीसीकडून ठाणे जिल्ह्याला होणारा पाणीपुरवठा बंद झाला होता.