कानपिचक्यानंतर सदस्य नोंदणीत वाढ
शिवसेनेचे तालुक्यात २३ हजार संख्या; पालकमंत्र्यांकडून कानमंत्र
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. १९ : शिवसेना सदस्य नोंदणीमध्ये सर्वांत मागे असलेल्या रत्नागिरी तालुक्याने मंत्री उदय सामंत यांच्या कानपिचक्यांमुळे मुसंडी मारली आहे. ग्रामीण भागात सुमारे १९ हजार तर शहरी भागामध्ये ४ हजारांच्यावर शिवसेना सदस्य नोंदणी झाली आहे. सद्यःस्थितीमध्ये २३ हजारांच्यावर सदस्या नोंदणी झाली आहे. महिनाभरात ती एक लाखांच्यावर करण्याचा चंग शिवसेना पदाधिकाऱ्यांनी बांधला आहे.
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून सर्वच पक्षांनी सदस्य नोंदणीचा कार्यक्रम हाती घेतला आहे. यामुळे शहरी आणि ग्रामीण भागामध्ये प्रत्येक पक्षाची कार्यकर्त्यांची फळी किती मोठी आहे, हे समजणार आहे. भाजपच्या सदस्य नोंदणीचा आढावा माजी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी घेतला होता. असमाधानकारक नोंदणीचे काम झाल्याबद्दल नारायण राणे यांनी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना डोस दिला.
शिवसेना पक्षाचीदेखील येथील जयेश मंगल पार्कमध्ये सदस्य नोंदणी आढावा बैठक झाली होती. विशेष म्हणजे या बैठकीत चिपळूणसह अन्य तालुक्यांनी चांगली आघाडी घेतली होती; परंतु पालकमंत्र्यांचाच तालुका पिछाडीवर होता. मंत्री सामंत यांनी पिछाडीबाबत जाहीर कबुली दिली; मात्र पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना कानमंत्र दिला. कोट्यवधीची विकासकामे पदाधिकाऱ्यांना दिली असताना त्या तुलनेत सदस्य नोंदणी झालेली नाही. पक्षासाठी दोन तास प्रामाणिक काम करा तरच पक्ष मजबूत होईल. सदस्य नोंदणीचा हा वेग वाढला पाहिजे, असे सांगितले होते. त्यामुळे पदाधिकारी आणि कार्यकर्ते कामाला लागले.
----------
कोट
शिवसेनेच्या सदस्य नोंदणीचा कार्यक्रम अजून एक महिना आहे. रत्नागिरी ग्रामीण आणि शहरी भागामध्ये सदस्य नोंदणीला चांगला प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे महिन्यात आम्ही तालुक्यात सदस्य नोंदणीचे एक लाख उद्दिष्ट पूर्ण करू.
- उदय सामंत, शिवसेना नेते आणि उद्योगमंत्री