कोल्हार: चंद्रापूर (ता. राहाता) येथील कृषिभूषण ॲग्रो टुरिझमला महाराष्ट्र कृषी पर्यटन उद्योजकता पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. प्रवरा परिसरातील कृषिभूषण बन्सी तांबे व प्रा. डॉ. विशाल तांबे या पिता-पुत्रांनी ॲग्रो टुरिझम विकसित केले आहे. त्यांनी लेखक व अभिनेते मिलिंद शिंदे यांच्या हस्ते पुण्यात हा पुरस्कार स्वीकारला.
महाराष्ट्र कृषी पर्यटन परिसंवाद २०२५ यांच्यातर्फे पुरस्कार देण्यात आला. यावेळी महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळाच्या सचिव डॉ. मीनाक्षी पाटील व परभन्ना फाउंडेशनचे अध्यक्ष गणेश चप्पलवार उपस्थित होते. तांबे पिता-पुत्रांनी कृषी क्षेत्रातील स्थित्यंतरात व्यवसायाची जोड दिली आहे. कृषिभूषण पर्यटन केंद्र हा ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना देणारा आणि रोजगाराच्या संधी निर्माण करणारा एक सक्षम सामाजिक उपक्रम ठरला आहे.
या केंद्राच्या माध्यमातून अनेकांना नियमित रोजगार मिळू लागला आहे. कृषिभूषण बन्सी तांबे कृषी पर्यटन केंद्राचे संस्थापक असून, कुटुंबातील सर्व सदस्यांना यामध्ये विविध जबाबदाऱ्या देण्यात आलेल्या आहेत. पत्नी उज्ज्वला केंद्राच्या संचालिका म्हणून काम पाहतात. संचालक विशाल व स्नुषा निशिगंधा तांबे विविध जबाबदाऱ्या सांभाळतात.
या केंद्रामध्ये अनेक स्नेहमेळाव्यांचे व सेवानिवृत्तीचे कार्यक्रम होतात. परिसरातील विद्यार्थी सहल आयोजित करून शिक्षकदिन साजरा करतात. लहान मुलांसाठी संस्कार शिबिराचे आयोजन केले जाते.