केज : शेतकऱ्यांच्या प्रगतीसाठी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतून विहिरींचे काम केले जाते. मात्र, या कामात लाभार्थ्याऐवजी अधिकाराचा गैरवापर करत प्रशासकीय कर्मचारीच माया कमवित असल्याचे चित्र आहे.
मस्साजोग येथील मिथून देशमुख यांच्या शेतात रोहयोची विहिर दाखवत ग्रामसेवक आणि रोजगार सेवकाकडून बिले उचलण्यात आली. त्यामुळे आता आपल्या शिवारातील विहिर चोरीला गेल्याची तक्रार शेतकरी मिथून देशमुख यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनातून केली आहे.
मस्साजोग येथील गट क्रमांक २५/२ बमधील ०.६१ आर एवढे क्षेत्र असलेल्या जमीनीमध्ये विहीर मंजूर करत विहिरीचे कसल्याही प्रकारचे काम न करताच पैसे उचलण्याचे काम येथील ग्रामसेवक व ग्रामरोजगार सेवकाकडून करण्यात आला आहे. मिथून देशमुख हे काही वर्षापासून आई-वडील आजारी असल्याने बीड येथे राहण्यास आले आहेत.
वडील गंभीर आजारी असल्याने २०२३-२४ या वर्षामध्ये गावातील शेतामध्ये जाणे कमी झाले. या काळातच येथील ग्रामसेवक दत्तात्रय गव्हाणे, ग्रामरोजगार सेवक अमोल बळीराम बनसोडे या दोघांनी संगणमत करून मिथून देशमुख यांच्या शेतात विहीर मंजूर केली.
देशमुख यांनी पंचायत समितीचे तत्कालीन गटविकास अधिकारी राजेंद्र मोराळे यांची भेट घेऊन सर्व प्रकार सांगितला. मात्र कारवाई न झाल्याने आता देशमुख यांनी विहिर चोरीला गेल्याचे सांगत जिल्हाधिकाऱ्यांकडे धाव घेतली आहे.