योगेश काशीद
बीड : अवकाळी पावसाने होत्याचे नव्हते केले आहे. सातत्याने होत असलेल्या अवकाळी पावसामुळे प्रचंड नुकसानीची झळ शेतकऱ्याला सहन करावी लागत आहे. यात अवकाळीमुळे काढणी केलेल्या कांदा वाहून गेल्याचे चित्र आष्टी तालुक्यातील शिंदेवाडी येथे पाहण्यास मिळत आहे. यामुळे संपूर्ण कांदा पाण्यात गेल्याने शेतकरी कुटुंबाचे अश्रू अनावर झाले होते.
च्या आष्टी तालुक्यातील शिंदेवाडी येथील महेश बापू दरेकर यांनी तीन एकर क्षेत्रामध्ये गेली पाच महिन्यांपूर्वी कांदा लागवड केली होती. कांदा शेतात काढून ठेवला. मार्केटमध्ये घेउन जायचा होता, पण गेली सहा दिवसापासून अवकाळी सुरु असल्याने महेश दरेकर यांच्या शेतातील जवळपास ३०० गोणी कांदा अक्षरशः शेतात अवकाळी पावसामूळे वाहून गेला आहे. या कांद्याचा अक्षरशः चिखल झाला आहे.
चिखलात माखलेला कांदा करावा लागतोय गोळा
दरम्यान भर पावसात दरेकर कुटूंबाला पावसाच्या पाण्यात वाहून गेलेला आणि चिखलात भिजलेला कांदा गोळा करण्याची वेळ आली आहे. यात सहा वर्षाची चिमुकली देखील कांदा गोळा करत आहे. या चिमुकली प्रगतीला वाटतंय की कांदा विकल्यावर माझे पप्पा मला चप्पल घेतील. शाळेची फिस भरतील, पण आज महेश दरेकर यांच्या हातात कांद्याचे पैसे ऐण्याऐवजी फक्त कांद्याचा चिखलच हाती येत आहे.
आता शाळेत कशी जाणार
चिमुकली प्रगती म्हणते की मी आता शाळेत कशी जाणार, पप्पा माझी फिस कशी भरणार तुम्हीच मदत करा साहेब. अशी भावनिक साद प्रगती घालते. हे सांगताना या चिमुकलीच्या डोळ्यात देखील पाणी आले होते. दरम्यान पाच महिन्यांची मेहनत पाण्यात गेली. आमचे सर्व रस्ते बंद झालेत. मुजूरांचे पैसे देणे बाकी आहे. पेरणीचे दिवस जवळ आल्याने खत बी- बियाणे कुठून आणायचे. मुलांची फिस कशी भरायची; अशी प्रतिक्रिया चिमुकल्या प्रगतीची आई सोनाली दरेकर यांनी दिली आहे.