नवी दिल्ली : जपानला मागे टाकत भारताची अर्थव्यवस्था जगात चौथ्या स्थानावर पोहोचली आहे. भारताच्या पुढे आता केवळ अमेरिका, चीन आणि जर्मनी हेच देश आहेत. विशेष म्हणजे आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने (आयएमएफ) गेल्या महिन्यात जारी केलेल्या अहवालात भारत लवकरच चौथी सर्वांत मोठी अर्थव्यवस्था बनू शकतो, असे भाकीत वर्तविले होते. देशाच्या अर्थव्यवस्थेचा आकार चार ट्रिलियन डॉलरच्या पुढे गेल्याची माहिती नीती आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) बी. व्ही. आर. सुब्रह्मण्यम यांनी दिली आहे.
देशांतर्गत आर्थिक सुधारणा तसेच इतर देशांकडून भारताला दिले जात असलेले झुकते माप यामुळे अर्थव्यवस्थेला बळ मिळाले असल्याचे सुब्रह्मण्यम यांनी स्पष्ट केले. विकासाची हीच गती कायम राहिली तर पुढील अडीच ते तीन वर्षांत आपण जर्मनीला मागे टाकू शकतो, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. निर्मिती क्षेत्राच्या बाबतीत भारत हा पर्यायी देश बनत चालला आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जगातील अनेक देशांवर आयात शुल्क लादले असून भारतही त्यातून सुटू शकलेला नाही, असे असताना देखील देशाची आर्थिक घौडदौड सुरू आहे. मागील काही वर्षांपासून देशाच्या ‘जीडीपी’चा सरासरी दर सात टक्क्यांच्या आसपास राहिलेला असल्याचे सुब्रह्मण्यम यांनी म्हटले आहे.
जीडीपी’ ६.८ टक्के राहणारभारताचा आर्थिक आलेख आगामी काळातही वाढतच राहण्याचा अंदाज जागतिक बॅंक आणि आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने (आयएमफ) व्यक्त केला आहे. चौथ्या तिमाहीत सकल देशांतर्गत उत्पादन (जीडीपी) ६.८ टक्के इतके राहू शकते. कृषी, सेवा, वाहतूक, पायाभूत सुविधा क्षेत्र सरस ठरले.