सांगली : राज्यात महिला अत्याचाराच्या घटना वाढत असून त्या रोखण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी कठोर पावले उचलावीत. भयमुक्त महाराष्ट्र निर्माण झाला पाहिजे, अशी अपेक्षा केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केली. अलमट्टी धरणाची उंची वाढवण्यावरून सुरू असलेल्या वादावरून आठवले यांनी महाराष्ट्र कर्नाटक म्हणजे भारत-पाकिस्तान आहेत काय, असा सवाल करत धरणाची उंची वाढवण्यास विरोध असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
ते म्हणाले,‘‘पुण्यातील घटनेनंतर पीडितेच्या कुटुंबीयांची भेट घेतली. त्यांच्याकडील व्हिडिओ पाहिले असता वैष्णवी हगवणे यांची आत्महत्या नसून हत्याच आहे हे स्पष्ट होते. वैष्णवीच्या आई-वडिलांनी दोन कोटी रुपये द्यावेत, या मागणीसाठी वैष्णवीचा सतत छळ केला जात. याप्रकरणी जे संशयित आहेत त्या सर्वांवर खुनाचा गुन्हा नोंद करावा. त्यासाठी पोलिसांना सूचना देण्यात आल्या आहेत. दुसऱ्या बाजूला महाराष्ट्रात दलित आणि महिलांवर अत्याचार वाढत असून ते रोखण्यासाठी मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कठोर पावले उचलावीत.’’
ते म्हणाले,‘‘ भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’ राबवून पाकिस्तानला जशास तसे उत्तर दिले. या यशामुळे ‘रिपाईं’तर्फे २९ मे रोजी मुंबईत भारत झिंदाबाद महारॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. ’’
महायुतीवर नाराजी; शरद पवारांचे कौतुकआठवले यांनी महायुतीवर थेट नाराजी व्यक्त करतानाच ज्येष्ठ नेते शरद पवार यांचे मात्र कौतुक केले. ते म्हणाले,‘‘माझ्या पक्षाचा एकही आमदार, खासदार नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मला तीन वेळा मंत्रिमंडळात घेतले. मात्र, आमच्या पक्षातील बाकीच्या लोकांना काही मिळत नाही. शरद पवार यांच्या काळात काँग्रेसच्या आघाडीबरोबर असताना आमच्या पक्षाचे सहा ते सात जण विधान परिषदेवर होते.’’