नागपूर : विदर्भातील बळिराजा ज्या क्षणाची चातकाप्रमाणे वाट पाहात होता त्या नैऋत्य मोसमी वारे अर्थात मॉन्सूनचे आज, बुधवारी विदर्भात अधिकृत ‘एन्ट्री’ केली. मॉन्सून गडचिरोलीमार्गे विदर्भात दाखल झाल्याची माहिती प्रादेशिक हवामान विभागाने दिली आहे.
हवामान विभागाने दिलेली ही माहिती शेतकऱ्यांसह सर्वसामान्यांसाठीही सुखद धक्का देणारी ठरली. मॉन्सून सक्रिय झाल्यामुळे शहरातही सायंकाळच्या सुमारास विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाने हजेरी लावून मॉन्सूनच्या आगमनावर शिक्कामोर्तब केले.
यंदा मॉन्सूनचा पॅटर्न व मूड एकदमच बदललेला दिसून येत आहे. सुरवातीला अंदमान, केरळ, गोवा आणि महाराष्ट्रात ‘सुपरफास्ट’ गतीने निर्धारित वेळेआधीच प्रवेश करणाऱ्या मॉन्सूनने विदर्भातही वेळेआधीच ‘एन्ट्री’ केली.
तब्बल ४५ वर्षांनंतर प्रथमच मॉन्सून विदर्भात लवकर दाखल झाल्याची माहिती, हवामान विभागाचे संचालक डॉ. प्रवीणकुमार यांनी ‘सकाळ’ला दिली. त्यांच्या मते १९८० नंतर पहिल्यांदाच मे महिन्यात विदर्भामध्ये मॉन्सूनचे आगमन झाले आहे. विदर्भात मॉन्सूनच्या आगमनाची तारीख १५ जूनच्या आसपास असते.
मुंबईच्या काही भागांत पावसाच्या जोरदार सरीमहामुंबईतील मुंबई शहर, उपनगरे आणि ठाण्यात आज अनेक ठिकाणी चांगला पाऊस झाला, तर रायगड, पालघर आणि नवी मुंबईत आज पावसाने उसंत घेतली. काही भागांतच तुरळक सरी कोसळल्या. मुंबई शहर आणि उपनगरांत आज मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला होता; मात्र सकाळपासून निरभ्र आकाशासह ऊन पडल्याचे दिसले. दुपारनंतर कुलाबा, दादर, पवई, बोरिवली आदी भागांत चांगला पाऊस झाला. परिणामी तिन्ही मार्गांवरील लोकल सेवा उशिराने धावत होत्या. ठाणे जिल्ह्यात सरासरी एकूण ११.०५ मिमी पावसाची नोंद झाली आहे.