Shreyas Iyer: 'लढाई हरलोय, युद्ध नाही!', RCB विरुद्ध पराभवानंतर PBKS कर्णधार नेमकं काय म्हणाला?
esakal May 30, 2025 03:45 PM

इंडियन प्रीमियर लीग २०२५ स्पर्धेत गुरुवारी (२९ मे) क्वालिफायर १ सामना झाला. मुल्लनपूरला झालेल्आ या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने पंजाब किंग्सला ८ विकेट्सने पराभूत करत अंतिम सामन्यात स्थान मिळवले. गोलंदाजी, फलंदाजी आणि क्षेत्ररक्षण अशा तिन्ही क्षेत्रात बंगळुरूने पंजाबविरुद्ध वर्चस्व ठेवले.

या सामन्यात बंगळुरूचा कर्णधार रजत पाटिदारने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर बंगळुरूच्या गोलंदाजांनी त्यांच्याच घरच्या मैदानात १४.१ षटकात १०१ धावांवर रोखले.

बंगळुरूकडून जोश हेडलवूड आणि सुयश शर्मा यांनी प्रत्येकी ३ विकेट्स घेतल्या. पंजाबकडून मार्कस स्टॉयनिसने सर्वाधिक २६ धावा केल्या. त्यानंतर बंगळुरूने फिल सॉल्टच्या नाबाद ५६ धावांच्या जोरावर १०२ धावांचे लक्ष्य सहज पार केले.

तथापि, पंजाब किंग्सला जरी या सामन्यात पराभवाचा धक्का बसला असला, तरी त्यांना क्वालिफायर २ स्पर्धा खेळून अंतिम सामन्यात पोहचण्याची संधी असणार आहे. या पराभवानंतर पंजाब किंग्सचा कर्णधार म्हणाला, ही लढाई हरलो असलो तरी युद्ध हरलेलो नाही.

तो म्हणाला, 'हा दिवस विसरण्यासारखा नाही. पण आम्ही परत जाऊन कुठे चुकलो, याचा अंदाज घेऊ. आम्ही पहिल्या डावात सातत्याने विकेट्स गमावल्या. मागे जाऊन आम्हाला काही गोष्टींचा अभ्यास करावा लागेल. खरं सांगायचं तर मला माझ्या निर्णयांवर शंका नाही.'

'आम्ही मैदानाबाहेर ज्या योजना आखल्या, त्या योग्य होत्या, पण आम्ही त्या मैदानात अंमलात आणू शकलो नाही. गोलंदाजांना दोष देऊ शकत नाही, कारण धावा खूप नव्हत्या. आम्हाला आमच्या फलंदाजीवर काम करावं लागेल, विशेषत: अशा खेळपट्टीवर.'

'आम्ही येथे जितकेही सामने खेळलो, तेव्हा येथे अनियमित उसळी होती. पण आम्ही असे कारणं देऊ शकत नाही, कारण शेवटी आम्ही प्रोफेशनल आहोत. आम्हाला परिस्थितीनुसार फलंदाजी करावी लागले आणि अपेक्षांवर खरे उतरावे लागेल. आम्ही लढाई हरलो, पण युद्ध नाही.'

आता एलिमिनेटमध्ये मुंबई इंडियन्स आणि गुजरात टायटन्स यांच्यात विजयी होणाऱ्या संघाविरुद्ध पंजाब किंग्सला क्वालिफायर २ सामन्यात खेळावं लागणार आहे. क्वालिफायर २ मध्ये जिंकणारा संघ अंतिम सामन्यात पोहचेल.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.