नाशिक : राज्याचे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे हे वादग्रस्त वक्तव्यासाठी ओळखले जातात. त्यांनी दोन महिन्यांपूर्वी म्हटले होते की, हल्ली भिकारीसुद्धा एक रुपया घेत नाही, पण आम्ही एक रुपयात शेतकऱ्यांना पीक विमा दिला. त्यानंतर त्यांनी म्हटले होते की, शेतकरी कर्जमाफीच्या पैशांचा वापर साखरपुडे आणि विवाहासाठी करतात. माणिकराव कोकाटे यांच्या या दोन वक्तव्यानंतर राज्यातील वातावरण तापले होते. दरम्यान आता अवकाळी पावसामुळे हातातोंडाशी आलेला घास हिरावल्याने शेतकरी मोठ्या चिंतेत सापडले आहेत. अशावेळी माणिकराव कोकाटे यांनी ढेकळांचे पंचनामे करायचे का? असे वक्तव्य केले आहे. त्यामुळे नवा वाद होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. (Manikrao Kokate lashed out over Panchnama after crops were damaged due to unseasonal rains)
मागील आठवड्यात राज्यातील अनेक भागांना मुसळधार ते अतिमुसळधार पावसाने झोडपून काढले. त्यामुळे शेतात उभ्या असलेल्या पिकांना मोठा फटका बसला. कांदा, आंबा, भुईमूगाच्या शेंगा यासारख्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. अवकाळी पावसाने हातातोंडाशी आलेला घास हिरावल्याने शेतकरी मोठ्या चिंतेत सापडला आहे. नाशिक जिल्ह्यातही कांदा, द्राक्षे आणि इतर पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. पार्श्वभूमीवर राज्याचे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे आज (30 मे) नाशिक जिल्ह्याच्या सिन्नर तालुक्यातील पांढुर्ली गावात अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी गेले होते. यावेळी माध्यमांशी संवाद साधताना ते पुन्हा एकदा बरळले आहेत.
हेही वाचा – Gokul Milk : गोकुळच्या अध्यक्षपदी हसन मुश्रीफांचे चिरंजीव नाविद यांची निवड, वडिलांचा विरोध तरीही…
नुकसानीच्या संदर्भात प्रश्न विचारला असता माणिकराव कोकाटे म्हणाले की, नुकसानीचे पंचनामे सुरू आहेत. याचवेळी त्यांना विचारण्यात आले की, शेतकरी आरोप करत आहेत की, फक्त उभ्या पिकांचे पंचनामे केले जात आहेत. यावर माणिकराव कोकाटे म्हणाले की, हार्वेस्टिंग झालेल्या पिकांचे पंचनामे करून काय होणार? ढेकळांचे पंचनामे करायचे का? जे कांदे वावरात आहेत, त्यांचेच पंचनामे होतील. जे घरात आणून ठेवले आहेत, त्यांचे पंचनामे होणार नाहीत. कारण त्यांचे पंचनामे करणे अवघड आहे आणि ते नियमातही बसत नाही. त्यामुळे शेतात जी काही पिके असतील त्यांचे रीतसर पंचनामे केले जातील, अशी माहिती माणिकराव कोकाटे यांनी दिली. मात्र त्यांनी ढेकळांचे पंचनामे करायचे का? असे वक्तव्य केल्याने आता विरोधक टीका करताना दिसतील. त्यामुळे पुन्हा एकदा राज्यातील वातावरण तापणार आहे.
हेही वाचा – Rohini Khadse : वैष्णवीचे प्रकरण सीआयडीकडे सोपवा, शंका उपस्थित करत रोहिणी खडसेंची मुख्यमंत्र्यांकडे मागणी