मुंबई : राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका मुलाखतीमध्ये ‘एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे संवादात कमी आहेत’ असे विधान केले होते. यावरून आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी महायुतीवर निशाणा साधला. ते म्हणाले की, “मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे तिघेही भीतीपोटी एकत्र आहेत. या तिघांमध्येही चांगला संवाद नसून महायुतीमध्ये आलबेल नाही,” असा दावा त्यांनी यावेळी केला आहे. संजय राऊत यांनी यावेळी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदावरूनही सरकारवर निशाणा साधला. (Sanjay Raut Shivsena UBT on CM Fadnavis statement on मराठी Ajit Pawar)
हेही वाचा : Ladki Bahin : लाडक्या बहिणी निघाल्या सरकारी कर्मचारी, महिला नोकरदारांनी लाटले इतके कोटी
“फडणवीस, शिंदे आणि अजित पवार यांच्यामध्ये मध्येही चांगला संवाद नाही आणि यांच्या महायुतीत आलबेल नाही. एकनाथ शिंदे जेव्हा शिवसेनेत होते, तेव्हा त्यांचा उद्धव ठाकरेंशी चांगला संवाद होता. परंतु आता या तिघांमध्ये मतभेद आहेत. तरीही हे तीन नेते महायुतीत एकत्र आहेत. हे सर्वजण भीतीपोटी, दहशतीपोटी एकत्र आहेत.” असा दावा खासदार संजय राऊत यांनी यावेळी केला. दरम्यान, यावेळी संजय राऊत म्हणाले की, “मला अनेक गोपनीय गोष्टींचा भांडाफोड करावा लागेल. स्वतंत्र पु्स्तकाचा विषय आहे, ज्या गोष्टी गोपनीय आहेत आपण असे मानतो त्यावरती लिहिणे बोलणे हे नैतिकतेला धरून नाही. आपण विश्वासाने काही गोष्टींची चर्चा करतो किंवा कोणी काही सांगते त्यानंतर आपल्या प्रसिद्धीसाठी गैरवापर करणे हे मला काही पटत नाही.” असे ते म्हणाले.
सध्या महाराष्ट्रात पुण्यातील वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणाची चर्चा आहे. यावारली राज्य महिला आयोगावरून विचारलेल्या प्रश्नावर शिवसेना उबाठा खासदार संजय राऊत म्हणाले की, “महिला आयोग राज्याचा किंवा राष्ट्रीय असेल त्या जागेवर अराजकीय व्यक्ती पाहिजे. राजकारणातील सोय म्हणून कोणी त्या पदावर नेमणूक करत असेल तर महिलांना न्याय मिळणार नाही. केंद्रात आणि राज्यात राजकीय व्यक्तीच आहे. राज्य महिला आयोग म्हणजे महिला आर्थिक विकास मंडळ नाही हे घटनात्मक पद आहे. यामुळे राज्यातल्या देशातल्या महिलांवरील अत्याचाराला वाचा फुटते. आम्ही त्याला काय करतो, की नेत्याच्या जवळच्या महिलेला त्या पदावर बसवतो आणि कॅबिनेट दर्जा देतो हे चुकीचे आहे,” असे म्हणत आरोप केले आहेत.