नाशिक : राज्याचे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे हे शेतकऱ्यांबद्दल वादग्रस्त केल्यामुळे याआधी अडचणीत सापडले आहेत. याआधी त्यांनी दोनदा माफी मागितली होती. पण आता अवकाळी पावसामुळे हातातोंडाशी आलेला घास हिरावल्याने शेतकरी मोठ्या चिंतेत सापडला आहे. अशावेळी नुकसाणीची पाहणी करण्यासाठी गेल्यानंतर माणिकराव कोकाटे यांनी माध्यमांशी संवाद साधताना ढेकळांचे पंचनामे करायचे का? असा प्रश्न उपस्थित केला होता. मात्र आता त्यांनी त्यांच्या वक्तव्यावर सारवासारव केली आहे. (Manikrao Kokate’s controversial statement and subsequent backlash after inspecting crops damaged by unseasonal rains)
माणिकराव कोकाटे म्हणाले की, सध्या शेतात कपाशी आणि सोयाबीन नाही. आता शेतात फळबागा उभ्या आहेत, पण अवकाळी पावसामुळे फळबागांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे. त्यामुळे मी वक्तव्य केलं होतं. पण माझ्या शब्दांचा तुम्ही वेगळा अर्थ घेतला, त्याला मी काय करू? ज्या शेतात आता काहीही नाही तिथे पंचनामे करून काय करणार? त्यामुळे मी काद्यांच्या बाबतीत पंचनामे करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. तसेच ज्या-ज्या ठिकाणी शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झालेलं आहे, त्या-त्या ठिकाणी मी पंचनामे करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत. त्यामुळे अवकाळी पावसामुळे ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झालं आहे, त्यांना नुकसान भरपाई मिळेल, अशी माहिती कोकाटे यांनी दिली.
हेही वाचा – Rohini Khadse : वैष्णवीचे प्रकरण सीआयडीकडे सोपवा, शंका उपस्थित करत रोहिणी खडसेंची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
माणिकराव कोकाटे म्हणाले की, ज्या शेतकऱ्यांच्या शेतात पिके आहेत, त्यांना माझं वक्तव्य वेगळं वाटण्याचं काही कारण नाही. पण ज्या शेतकऱ्यांच्या शेतात पिके नाहीत त्याचे पंचनामे कसे करणार? त्यामुळे जे खरं आहे तेच बोललो. शब्द चुकला असेल पण माझ्या बोलण्याचा वेगळा अर्थ घेतला गेला, अशी सारवासारव माणिकराव कोकाटे यांनी केली.
शेतकरी आरोप करत आहेत की, फक्त उभ्या पिकांचे पंचनामे केले जात आहेत. यासंदर्भात प्रश्न विचारला असता माणिकराव कोकाटे म्हणाले होते की, हार्वेस्टिंग झालेल्या पिकांचे पंचनामे करून काय होणार? ढेकळांचे पंचनामे करायचे का? जे कांदे वावरात आहेत, त्यांचेच पंचनामे होतील. जे घरात आणून ठेवले आहेत, त्यांचे पंचनामे होणार नाहीत. कारण त्यांचे पंचनामे करणे अवघड आहे आणि ते नियमातही बसत नाही. त्यामुळे शेतात जी काही पिके असतील त्यांचे रीतसर पंचनामे केले जातील, अशी माहिती माणिकराव कोकाटे यांनी दिली. मात्र त्यांनी ढेकळांचे पंचनामे करायचे का? असे वक्तव्य केल्याने आता विरोधक टीका करताना दिसतील. त्यामुळे पुन्हा एकदा राज्यातील वातावरण तापणार आहे.
हेही वाचा – Gokul Milk : गोकुळच्या अध्यक्षपदी हसन मुश्रीफांचे चिरंजीव नविद यांची निवड, वडिलांचा विरोध तरीही…