वृत्तसंस्था / नवी दिल्ली
‘सिंदूर’ अभियानात भारताची युद्ध विमाने पडली काय, असा प्रश्न वारंवार विचारला जात आहे. भारताच्या वायुदलाने यासंबंधात सकारात्मक किंवा नकारात्मक असे कोणतेही स्पष्ट उत्तर दिलेले नाही. आमचे सर्व विमानचालक सुरक्षित आहेत, एव्हढीच माहिती शस्त्रसंधी झाल्यानंतर देण्यात आली होती. तरीही हा प्रश्न विचारला जात असून तज्ञांनी त्याचे विविध अर्थ लावले आहेत.
काही तज्ञांच्या मते हा प्रश्न निरुपयोगी आहे. भारताची युद्ध विमाने पडली असली तर त्यांच्या अवशेष सापडले असते. ते ज्या भागात पडले, त्याच्या आसपास राहणाऱ्या सर्वसामान्य लोकांच्याही लक्षात ही बाब आली असती. अलिकडे सर्वांच्या हाती मोबाईल असतोच. त्यातून छायाचित्रे किंवा व्हिडीओ काढून तो प्रसारित करण्यात आला असता. तसेच विमाने पडली असतील तर त्यांच्या चालकांचे काय झाले असाही प्रश्न आहे. चालक हुतात्मा झाला असेल तर ती बाब लपून रहात नाही. कारण चालकाच्या नातेवाईकांनी चौकशी केलीच असती. त्यामुळे सर्व वैमानिक सुरक्षित आहेत, ही बाब पूर्ण सत्य आहे. समजा, वैमानिकांनी एक्झिट घेतली असती, तरी ती बाब लपून राहिली नसती. कारण ते जेथे उतरले असते, तेथे त्यांना आसपासच्या सर्वसामान्यांनी पाहिलेच असते. तसेही काही घडल्याचे वृत्त नाही. त्यामुळे वायुदल अधिकाऱ्यांनी हेतुपुरस्सर किंवा डावपेचांचा एक भाग म्हणून या संदर्भात संदिग्धता ठेवली आहे काय, असाही प्रश्न विचारला जात आहे. सध्यातरी हा प्रश्न अनुत्तरित आहे. परिणामी, जोपर्यंत या संबंधी स्पष्टता येत नाही, तो पर्यंत अनुमाने काढली जाऊ नयेत.तसे केल्यास विपरीत परिणाम होऊ शकतो, असे आवाहनही काही तज्ञांनी केले आहे.