शशी थरुर यांच्या नाराजीमुळे वक्तव्य घेतले माघारी
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
दक्षिण अमेरिकेतील कोलंबिया या देशाने पाकिस्तानच्या समर्थनाच्या संदर्भातील आपली भूमिका मागे घेतली आहे. पाकिस्तान आणि त्याच्या दहशतवादाला जगासमोर उघडे पाडण्यासाठी भारताने चालविलेल्या ‘ग्लोबल आऊटरीच’ अभियानाचे हे मोठे यश आहे. कोलंबिया सरकारने भारताच्या ‘सिंदूर’ अभियानात पाकिस्तानात जी हानी झाली, तिच्यासंबंधात दु:ख व्यक्त केले होते.
काँग्रेस नेते शशी थरुर यांच्या नेतृत्वात भारताच्या सात सर्वपक्षीय खासदारांचा गट कोलंबियाच्या दौऱ्यावर होता. दहशतवाद हे पाकिस्तान प्रशासनाचे धोरण असून पाकिस्तान जगभरात दहशतवाद निर्यात करीत आहे, हे भारताने सप्रमाण दाखवून दिले आहे. शशी थरुर यांनी कोलंबियाच्या प्रशासनाला सिंदूर अभियानाच्या संदर्भात भारताची भूमिका पटवून देण्याचा प्रयत्न केला होता. तथापि, कोलंबियाच्या प्रशासनाने पाकिस्तानचीच बाजू लावून धरली होती. तसेच, भारताशी झालेल्या सशस्त्र संघर्षात पाकिस्तानच्या झालेल्या हानीसंबंधी दु:ख व्यक्त केले होते. पण पहलगाम येथे पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद्यांनी केलेल्या हिंदू पर्यटकांच्या नृशंस हत्याकांडाच्या निषेधार्थ एक शब्दही उच्चारला नव्हता.
थरुर यांची नाराजी
कोलंबियाच्या पाकिस्तान समर्थक भूमिकेवर भारतीय गटाचे नेते शशी थरुर यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर, कोलंबिया प्रशासनाने आपले पाकिस्तान समर्थक विधान मागे घेतले. स्वत: शशी थरुर यांनी ही माहिती पत्रकारांना दिली आहे. प्रत्येक देशाला आपली भूमिका ठरविण्याचा अधिकार आहे. तथापि, दहशतवादाच्या संदर्भात साऱ्या जगाची भूमिका एकसमान असावयास हवी. दहशतवादाचे भरण पोषण करणाऱ्या देशांविरोधात साऱ्यांनी एकत्र यावयास हवे, अशी भारताची इच्छा आहे, असे थरुर यांनी आपल्या प्रतिक्रियेत स्पष्ट केले.
पुरविली सबळ माहिती
कोलंबिया प्रशासनाला आम्ही पाकिस्तानच्या विरोधात सबळ आणि सकारण माहिती पुरविली आहे. तसेच पाकिस्तान कशा प्रकारे दहशतवाद पोसतो, यावरही पुराव्यांच्या आधारावर प्रकाश टाकला. त्यामुळे कोलंबियाने आता आपले विधान मागे घेतले आहे, अशी माहिती भारतीय प्रतिनिधिमंडळातील एक सदस्य, भारताचे अमेरिकेतील माजी राजदूत आणि भारतीय जनता पक्षाचे नेते तरणजीतसिंग संधू यांनी शनिवारी पत्रकारांना दिली. कोलंबियाची विधान माघार हा पाकिस्तानसाठी धक्का आहे. कारण, भारताच्या विविध शिष्टमंडळांनी भेटी दिलेल्या सर्व देशांमध्ये पाकिस्तानचे समर्थन करणारा, कोलंबिया हा एकच देश होता. आता त्या देशानेही वस्तुस्थिती समजून घेतल्याने पाकिस्तान खऱ्या अर्थाने एकाकी पडला आहे.
अंतर समजून घ्या
जे देश दहशतवाद निर्यात करतात आणि जे देश दहशतवादापासून स्वत:चे संरक्षण करतात, त्यांच्यातील अंतर कोलंबियाने समजून घ्यावे. भारताने दहशतवादाविरोधातील संघर्षाचा एक भाग म्हणून पाकिस्तानविरोधात ‘सिंदूर’ अभियान चालविले. पाकिस्तानी दहशतवाद्यांनी पहलगाम येथे हल्ला केला, म्हणून भारताला पाकिस्तानातील दहशतवाद्यांचे तळ उध्वस्त करावे लागले. पाकिस्तानने भारताच्या नागरी वस्त्यांवर आणि सैनिकी तळांवर हल्ले करण्याचा प्रयत्न केला, म्हणून आम्हाला जशास तसे प्रत्युत्तर द्यावे लागले. हे अंतर आता कोलंबियाने समजून घ्यावे, अशी मागणी भारताच्या शिष्टमंडळाने केली होती. ती मान्य झाल्याने कोलंबियाने आपली पूर्वीची भूमिका सोडली, हे स्पष्ट झाले आहे.
भारताच्या मुत्सद्देगिरीला सर्वत्र यश
भारताने आपल्या खासदारांची शिष्टमंडळे अनेक देशांना पाठविली आहेत. त्यांच्यापैकी प्रत्येक देशाने भारताच्या दहशतवादविरोधी भूमिकेचे समर्थन केले आहे. त्यामुळे हे अभियान मोठ्या प्रमाणात यशस्वी झाल्याचे दिसून येते, असे तज्ञांचे मत आहे. जगाच्या व्यासपीठावर दहशतवादाविरोधात कशी कठोर भूमिका घेण्याची आवश्यकताच होती. पाकिस्तानचे प्रशासन दहशतवाद्यांच्या हातातील बाहुले आहे. त्यामुळे या प्रशासनालाही धडा शिकविण्याचे उत्तरदायित्व विश्वसमुदायाचे आहे, ही आपली भूमिका भारताने या अभियानाच्या माध्यमातून जगभर पोहचविली आहे.
पाकिस्तान एकटा आहे
ड भारताच्या भूमिकेचे जगभर समर्थन, दहशतवादावर पाकिस्तान एकाकी
ड शशी थरुर यांनी धडाडीने मांडली भारताची भूमिका, सरकारला समाधान
ड स्वत:च्या बचाव करण्याचा भारताला अधिकारच, हा संदेश जगात प्रसारित
ड भारताच्या सर्व शिष्टमंडळांची कामगिरी उत्तम झाल्याचे तज्ञांचे प्रतिपादन