टीम इंडिया अवघ्या काही दिवसांनी इंग्लंड दौऱ्यावर जाणार आहे. टीम इंडिया इंग्लंड विरुद्ध या दौऱ्यात एकूण 5 सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. बीसीसीआयने या मालिकेसाठी 24 मे रोजी 18 सदस्यीय भारतीय संघाची घोषणा केली. बीसीसीआयने रोहित शर्मा याच्या निवृत्तीनंतर शुबमन गिल याची कर्णधारपदी नियुक्ती केली. तर ऋषभ पंत याला उपकर्णधारपदाची जबाबदारी दिली. टीम इंडियाच्या इग्लंड दौऱ्याची सुरुवात 20 जूनपासून होणार आहे. या दौऱ्यासाठी निवड समितीने साई सुदर्शन याला पहिल्यांदाच संधी दिली. तर करुण नायर याचं अनेक वर्षांनंतर भारतीय संघात कमबॅक झालं.
निवड समितीने गेल्या अनेक वर्षांपासून टीम इंडियातून बाहेर असलेल्या चेतेश्वर पुजारा याला संधी दिली नाही. विराट कोहली आणि रोहित शर्मा यांच्या निवृत्तीनंतर चेतेश्वर पुजारा आणि अजिंक्य रहाणे या अनुभवी जोडीला संधी मिळेल, अशी आशा होती. मात्र तसं होऊ शकलं नाही. पुजाराने या दौऱ्यासाठी काही दिवस बाकी असताना मोठा खुलासा केला आहे. पुजाराने नक्की काय म्हटलं? जाणून घेऊयात.
चेतेश्वर पुजारा याने ‘द लल्लनटॉप’ला मुलाखत दिली. पुजाराला या मुलाखतीत तुला इंग्लंड दौऱ्यासाठी हेड कोच गौतम गंभीरचा कॉल आला होता का? असा प्रश्न विचारण्यात आला. पुजाराने काय उत्तर दिलं? जाणून घेऊयात.
“नाही. मात्र मी कसोटी संघात कमबॅक करण्यासाठी तयार आहे. मला जर संधी मिळाली तर देशाचं पुन्हा प्रतिनिधित्व करणं माझ्यासाठी सन्मानाची बाब असेल. एक क्रिकेटर म्हणून तु्म्ही जोवर फिट आहात आणि योगदान देता, तसेच देशांतर्गत क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी करता, तोवर तुम्ही चांगल्या लयीत आहात, असं जाणवतं. मला संधी मिळाळी तर फार आनंद होईल”, असं पुजाराने स्पष्ट केलं.
दरम्यान चेतेश्वर पुजारा टेस्ट टीम इंडियातून 2 वर्षांपासून दूर आहे. पुजाराने टीम इंडियासाठी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप 2025 फायनलमध्ये खेळला होता. त्यानंतर पुजाराला भारतीय संघात संधी मिळालेली नाही. पुजाराला देशातर्गंत क्रिकेटमध्ये उल्लेखनीय कामगिरी करुनही संधी मिळालेली नाही. पुजारा 37 वर्षांचा आहे. तसेच संधी न मिळूनही पुजाराने निवृत्ती जाहीर केलेली नाही. पुजाराने 103 कसोटी सामन्यांमध्ये 19 शतकांच्या मदतीने 7 हजार 195 धावा केल्या आहेत.