सोलापूर : प्रवाशांना दर्जेदार सुविधा देण्याबरोबरच कर्मचाऱ्यांना देखील आर्थिक दृष्ट्या सक्षम करणाऱ्या एसटीला देशातील क्रमांक एकची परिवहन संस्था निर्माण करणे हेच ध्येय असेल, असे प्रतिपादन परिवहन मंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी केले.
एसटीच्या ७७ व्या वर्धापन दिनानिमित्त यशवंत नाट्य मंदिर येथे आयोजित केलेल्या नाविन्यपूर्ण योजनांचा शुभारंभ आणि गौरव पुरस्कार सोहळ्यानिमित्त बोलत होते. या वेळी एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय डॉ. माधव कुसेकर एसटीचे सर्व वरीष्ठ अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.
यावेळी बोलताना म्हणाले की, गेली ७७ वर्ष ऊन, वारा पाऊस याची तमा न बाळगता चांद्यापासून बांद्यापर्यंत आणि गाव खेड्यापासून आदिवासी पाड्यापर्यंत समाजातील सर्व घटकांना सातत्याने प्रवासी सेवा देण्याचं काम एसटीने अविरतपणे केलेल आहे. भविष्यात एसटी आपला शतकोत्तर महोत्सव निश्चित पूर्ण करेल, कारण महाराष्ट्रातल्या सर्व सामान्य जनतेचा आशीर्वाद आणि पाठबळ एसटीला मिळालेला आहे.
७५ वर्षांपेक्षा जास्त काळ टिकून राहिलेल्या खूप कमी संस्था देशात अस्तित्वात आहेत. अर्थात, एसटी महामंडळ त्यापैकी एक आहे. आज ७७ वर्षानंतर देखील महाराष्ट्राच्या सामाजिक जीवनातील एसटीचे महत्त्व यत किंचितही कमी झालेलं नाही. त्यामुळे " लोकाश्रय " लाभलेली आपली भविष्यात अशीच मार्गक्रमण करत राहील, असा मला विश्वास वाटतो.
भविष्यात दळणवळण क्षेत्रात होणारे संभाव्य बदल लक्षात घेता प्रवाशांना अधिक सुरक्षित आणि स्वच्छ अशी " स्मार्ट एसटी " उपलब्ध करून देण्याचा आपला मानस आहे. असे प्रतिपादन मंत्री सरनाईक यांनी यावेळी केले.
यावेळी " बस फॉर असं " या एसटीप्रेमी संस्थेने तयार केलेले गेल्या ७७ वर्षातील एसटीचा प्रवास चित्रमय रित्या दाखवण्यात आलेले एसटीचा वाहननामा हे कॉफी टेबल पुस्तक मान्यवरांच्या हस्ते प्रकाशित करण्यात आले. यावेळी एसटीतील सर्वोत्कृष्ट अधिकाऱ्यांचा "अध्यक्ष सुवर्णपदक" देऊन गौरव करण्यात आला.
त्यामध्ये धुळे -नंदुरबार विभागाचे विभाग नियंत्रक विजय गीते साक्री आगाराचे आगार व्यवस्थापक सुनील महाले , धुळे -नंदुरबार विभागाचे यंत्र अभियंता पंकज महाजन, जालना विभागाचे यंत्र अभियंता सुरेंद्र तांदळे व सिंधुदुर्ग विभागाचे स्थापत्य अभियंता अक्षय केंकरे यांचा मंत्री सरनाईक यांच्या हस्ते सुवर्ण पदक व प्रशस्तीपत्र देऊन गौरव करण्यात आला.
आगाऊ आरक्षण करणाऱ्या प्रवाशांना सवलतकमी गर्दीच्या हंगामामध्ये प्रवाशांची संख्या वाढावी या उद्देशाने लांब पल्ल्याच्या प्रवासादरम्यान आगाऊ आरक्षण करणाऱ्या प्रवाशांना तिकीट दरामध्ये १५ टक्के सवलत देण्याची घोषणा यावेळी मंत्री सरनाईक यांनी केली त्यानुसार येत्या जुलैपासून ही योजना कार्यान्वित होणार आहे. याचा फायदा ई- शिवनेरी सारख्या बसने प्रवास करणाऱ्या अनेक लोकांना होणार आहे.