हमीभाव वाढीचा खर्चाशी कसा साधायचा ताळमेळ?
esakal June 03, 2025 12:45 AM

काटेवाडी, ता. २ : केंद्राने खरीप हंगाम २०२५-२६ साठी १४ पिकांच्या किमान आधारभूत किमती (एमएसपी) जाहीर केल्या आहेत. कृषी किंमत व मूल्य आयोगाच्या शिफारशीनुसार, हमीभाव हा उत्पादन खर्चाच्या १.५ पट निश्चित करण्याचे धोरण सरकारने अवलंबले आहे. परंतु, उत्पादन खर्चात मागील तीन वर्षात ३०-५० टक्के वाढीच्या तुलनेत हमीभाव वाढ १२.५ ते २३.९ टक्केच वाढ झाली आहे. उत्पादन खर्चाच्या तुलनेत ही वाढ अपुरी आहे. खर्चाशी ताळमेळ कसा साधायचा? असा प्रश्न शेतकरी तसेच कृषी तज्ज्ञांना पडला आहे.

हमीभाव वाढीत सोयाबीन, कापूस, तूर, मका, ज्वारी आणि बाजरी या प्रमुख पिकांचा समावेश आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकीत २८ मे २०२५ रोजी झालेल्या केंद्रीय या वाढीला मंजुरी देण्यात आली. सरकारने हमीभावात वाढ केली. मात्र, ती अपुरी आहे. शेतकऱ्यांना हमीभावाचा पूर्ण लाभ मिळण्यासाठी प्रभावी खरेदी यंत्रणा, बाजारभावातील स्थिरता आणि हवामान बदलांवर उपाययोजना आवश्यक आहेत. सध्या बियाणे, मजुरी, इंधन आणि पाण्यासाठीचा खर्च ३०-५० टक्के वाढला आहे. यामुळे हमीभावाचा काही फायदा होणार नसल्याचे काही शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

दृष्टिक्षेपात हमीभाव
(२०२३-२४ ते २०२५-२६)
पीक......२०२३-२४...२०२४-२५...२०२५-२६...टक्के
सोयाबीन....४३००.....४८९२.....५३२८.......२३.९
कापूस.....६६२०.....७१२१.....७७१०.........१६.५
तूर.......७०००......७५५०.....८०००....१४.३
मका.......२०९०.....२२२५.....२४००....१४.८
ज्वारी हायब्रीड..३१८०....३३७१.....३६९९....१६.३
ज्वारी मालदांडी..३२२५....३४२१.....३७४९....१६.२
बाजरी.......२५००.....२६२५.....२८१२....१२.५


सोयाबीन:
सरासरी उत्पादन खर्च.............. ४,०००-४,५००
(प्रतिक्विंटल हमीभाव ५,३२८ रुपये (१.२-१.३ पट).
शेतकऱ्यांकडून हमीभावाची मागणी ..............६०००

कापूस:
सरासरी उत्पादन खर्च ............५,५०० ते ६,५००
प्रतिक्विंटल (१.३-१.४ पट).
शेतकऱ्यांकडून हमीभावाची मागणी................८,११० रुपये.

तूर
सरासरी उत्पादन खर्च .....................५,५००-६,०००
हमीभाव................८,०००

मका
खर्च.....................१,६००-१,८००
शेतकऱ्यांकडून हमीभावाची मागणी.....................२,४००


ज्वारी आणि बाजरी
खर्च................२,५००-३,००० रुपये,
शेतकऱ्यांकडून हमीभावाची मागणी .............३,६९९-३,७४९

उत्पादन खर्चात वाढ (टक्के)
खतांच्या किमती.................... १२-१५
मजुरी.................... ३०-४०
इंधन .................... १०-१५

सध्याचा प्रतिहेक्टर खर्च.................१५,०००-२२,०००

हवामान, दुष्काळामुळे उत्पादकता घसरली

सोयाबीन, तूर आणि ज्वारीचे बाजारभाव अनेकदा हमीभावापेक्षा कमी असतात, ज्यामुळे शेतकऱ्यांना नुकसान सहन करावे लागते. प्रतिकूल हवामान, अनियमित पाऊस आणि दुष्काळामुळे उत्पादकता ७५-८० टक्के घसरली आहे, ज्यामुळे खर्च वाढला आहे.

सरकारने या प्रक्रियेमध्ये अजिबातच हस्तक्षेप करू नये. शेतकऱ्यांना हमीभाव नकोच आहे. त्यापेक्षा शेतमाल विक्री बाजार खुला करण्यात यावा. आयात निर्यातीवरची बंधने काढून टाकली जावीत. फक्त आणीबाणीच्या परिस्थितीमध्ये सरकारने यामध्ये हस्तक्षेप करावा. एखादी पीक हमीभावापेक्षा जास्त दराने विकले जाऊ लागले की लगेच व्यापारी लॉबी व सरकार देखील आयात व निर्यातीची बंधने लादून हमीभावाच्या आत मध्येच हा दर ठेवण्यात धन्यता मानतात. उत्पादन खर्च दिवसेंदिवस वाढत जाणारच आहे. तसेच नैसर्गिक आपत्तीमुळे देखील शेतकऱ्यांचे नुकसान प्रचंड प्रमाणात होत आहे. त्यामुळे आता उत्पादन खर्चामध्ये हा रिस्क फॅक्टर देखील धरण्यात यावा.
- अनिल घनवट, शेती प्रश्नांचे अभ्यास व अध्यक्ष, स्वतंत्र भारत पक्ष

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.