श्रीवर्धनमध्ये कायदा व सुव्यवस्थेचे तीनतेरा
पोलिस ठाण्यात अनेक पदे रिक्त; ४८ गावांची जबाबदारी ३२ कर्मचाऱ्यांवर
श्रीवर्धन, ता. २ (वार्ताहर) ः श्रीवर्धन पोलिस ठाण्यात अपुऱ्या पोलिस कर्मचाऱ्यांमुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर बनला आहे. श्रीवर्धन पोलिस हद्दीत शेखाडी, बागमांडला व जीवनाबंदर ही संवेदनशील बंदरे येतात, शिवाय ४८ गावांचे एकूण क्षेत्रफळ ६२८.३४ चौरस किलोमीटर असून, लोकसंख्या ४६, ९३९ इतकी आहे, मात्र एवढ्या मोठ्या लोकसंख्येच्या सुरक्षेची जबाबदारी फक्त ३२ कर्मचारी सांभाळत असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे.
भारतीय नौदलाने केलेल्या सर्वेक्षणात महाराष्ट्राच्या किनारपट्टीवरील ५९१ बंदरांपैकी रायगड जिल्ह्यातील २० बंदरे संवेदनशील असल्याचा अहवाल दिला होता. या २० बंदरापैकी शेखाडी, बागमांडला व श्रीवर्धन येथील जीवनाबंदर ही तीन संवेदनशील बंदरे श्रीवर्धन पोलिस ठाणे हद्दीत येतात. १९९३ रोजी मुंबई येथे झालेल्या भीषण बॉम्बस्फोटात वापरण्यात आलेले आर. डी. एक्स. स्फोटके श्रीवर्धन पोलिस ठाणे हद्दीतील शेखाडी समुद्रकिनाऱ्यावर उतरविण्यात आली होती. त्यानंतर ते मुंबईमध्ये दाखल झाले होते. मुंबईत झालेल्या १२ साखळी बॉम्बस्फोटांना १२ मार्च २०२५ रोजी बत्तीस वर्षे पूर्ण झाली आहे. काही महिन्यांपूर्वी श्रीवर्धन पोलिस ठाणे हद्दीतील हरिहरेश्वर येथील समुद्र किनाऱ्यावरील बोटीत ए. के. ४७ व शस्त्रसाठा आढळून आला होता. या कारणास्तव रायगड जिल्ह्यातील समुद्रकिनारे संवेदनशील व दहशतवाद्यांच्या रेकीत असल्याचे निदर्शनास येत आहे. २६ नोव्हेंबर २००८ रोजी मुंबई येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याला १७ वर्षे पूर्ण होतील. मुंबई शहर दहशतवाद्यांच्या कायम हिटलिस्टवर असते. मुंबई शहरात प्रवेश करण्यासाठी रायगड जिल्ह्यातील किनारपट्टयांचा वापर करण्यात येतो, हे काही घटनांमधून स्पष्ट झाले आले. तालुक्यातील पावसाळी चार महिने सागरी सुरक्षा अभियानदेखील रामभरोसे असते.
.....................
बेशिस्त पर्यटकांची डोकेदुखी
श्रीवर्धन पोलिस ठाणे हद्दीत हत्या, बलात्कार, मारामारी, जबरी चोरी, भुरट्या चोऱ्या, महिलांची छेडछाड आणि अपहरण आदी गुन्ह्यांचे प्रमाण अत्यल्प आहे, परंतु दिवसेंदिवस वाढत जाणारे पर्यटन ही चिंतेची बाब ठरत आहे. हरिहरेश्वर येथील एका होम स्टे चालकाशी खोली भाड्यावरून झालेल्या वादातून पर्यटकाने चालकाच्या बहिणीच्या अंगावर गाडी नेत जीवे मारल्याची घटना काही महिन्यांपूर्वी घडली होती. समुद्रकिनाऱ्यावर मद्यपान करून अर्वाच्च शिवीगाळ करणे तसेच महिलांच्या मनात लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन करणे हे प्रमाण वाढले आहे. काही दिवसांपूर्वी श्रीवर्धन किनाऱ्यावर पर्यटकांच्या दोन गटात हाणामारीची घटना घडली आहे. काही पर्यटकांच्या अशा गुन्हेगारी वृत्तीमुळे शांतता भंग होत असून, पोलिस कर्मचारी पुरेसे उपलब्ध झाल्यास अशा घटनांना आळा बसेल.
===================================================================================================
साप्ताहिक सुट्टींचा अभाव
अपुरे पोलिस कर्मचारी त्यातच व्हीआयपी सुरक्षा, मोर्चे, आंदोलने, सण-उत्सव, उपोषणे त्यातच हद्दीत कुठला गुन्हा घडला तर त्याचा तपास करताना पोलिस यंत्रणेवर ताण येतो. त्यातच काही वेळा सागरी किनाऱ्यांकडे सुरक्षेच्या दृष्टीने लक्ष द्यावे लागते. या सर्व जबाबदाऱ्या सांभाळताना पोलिस कर्मचाऱ्यांना हक्काची साप्ताहिक सुट्टी व नैमित्तिक रजाही मिळत नाही.
===================================================================================================
रिक्त पदे:-
(१) पोलिस निरीक्षक :- मंजूर पदे ०१ हजर ०१ रिक्त ००
(२) पोलिस उपनिरीक्षक :- मंजूर पदे ०२ हजर ०५ (अतिरिक्त ०३)
(३) सहाय्यक फौजदार :- मंजूर पदे ०४ हजर :- ०१ :-रिक्त:- ०३
(४) पोलिस हवालदार :- मंजूर पदे ०८ हजर :- पुरूष ०९ व महिला ०१ (अतिरिक्त ०२)
(५) पोलिस नाईक :- मंजूर पदे १६ हजर :- ०३ रिक्त १३
(६) पोलिस शिपाई :- मंजूर पदे ३७ हजर पुरूष १७ व महिला ०३ रिक्त १७
=================================================================================================
प्रतिक्रिया :-
जिल्ह्यासाठी हा एक अतिशय महत्त्वाचा बंदोबस्त असल्याने शिवराज्याभिषेकानंतर बदल्या केल्या जातील. राज्याभिषेक बंदोबस्तानंतर मंजूर संख्याबळ हस्तांतरण केले जाईल.
- आंचल दलाल, पोलिस अधीक्षक, रायगड