भिवंडी : मुंबई-नाशिक महामार्गावरील भिवंडी तालुक्यातील पडघानजीकच्या बोरिवली गावात सोमवारी पहाटे तीनच्या सुमारास महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) शोधमोहीम राबवत २२ ठिकाणी छापे घातले. दहा तासांच्या या कारवाईत संशयितांकडून मोबाईल फोन, तलवारी, मालमत्तांबाबतची कागदपत्रे आणि दहशतवादाला चिथावणी देणारी आक्षेपार्ह कागदपत्रे ताब्यात घेतली आहेत. या कारवाईबाबत कमालीची गुप्तता बाळगण्यात आली होती.
ठाणे ग्रामीण पोलिस अधीक्षक डॉ. डी. एस. स्वामी यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणे ग्रामीण, रायगड ग्रामीण येथील या कारवाईदरम्यान ३५० हून अधिक पोलिस, शीघ्रकृती दलांच्या जवानांनी गावाला वेढा दिला होता, तर महाराष्ट्र एटीएस पथकातील सुमारे १०० अधिकारी-कर्मचाऱ्यांनी या गावातील ‘सिमी’चा माजी सदस्य साकिब नाचण याच्यासह अनेक जणांच्या घरांमध्ये शोधमोहीम राबवली. महिलांकडून या कारवाईत अडथळा आणला जाऊ नये, यासाठीही खबरदारी घेण्यात आली होती.
मुंबई एटीएस पथकासह ठाणे, नाशिक येथील २२ पथकांनी या कारवाईत सहभाग घेतला होता. दहा तासांनी दुपारी एक वाजता ही शोधमोहीम पूर्ण झाली. या कारवाईत बोरिवली गावातील साकिब नाचण याच्या घरातील जामिनावर असलेल्या आकिब नाचणसह एकूण २२ घरांची तपासणी करून संशयितांचे मोबाईल फोन, तलवारी, सुरे, मालमत्तेबाबतची कागदपत्रे आणि दहशतवादाला चिथावणी देणारी आक्षेपार्ह कागदपत्रे ताब्यात घेण्यात आली. एटीएस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सायंकाळी पाचपर्यंत कोणालाही अटक झालेली नव्हती. या कारवाईत संशयित व्यक्तींचे इलेक्ट्रॉनिक साहित्य ताब्यात घेतले आहे. यात काही आक्षेपार्ह आढळल्यास त्यांना एटीएसकडून नोटीस बजावून चौकशीसाठी बोलावण्यात येणार आहे.
बोरिवली गाव ‘सिमी’चा अड्डा?२०२३ मध्ये ‘एनआयए’च्या पथकाने दहशतवादी कृत्यांतील सहभागावरून ‘सिमी’चा माजी सदस्य साकिब नाचणसह बोरिवली गावातील १५ जणांना ताब्यात घेतले होते, तसेच पुणे येथील दहशतवादी मोड्यूलमधील तीन जणांसह साकिब नाचण याचा मुलगा आकिब यास ताब्यात घेतले होते. २००३ च्या मुंबई साखळी बॉम्बस्फोटात साकिब नाचण याचा सहभाग असल्याचे सिद्ध झाल्यानंतर हे गाव सिमी संघटनेचा मुख्य अड्डा असल्याचे उघड झाले होते. या घटनेनंतर पडघ्याजवळील बोरिवली हे गाव प्रथमच चर्चेत आले होते.