Maharashtra Rain : मे महिन्यात महाराष्ट्रात सरासरीच्या १०००% पेक्षा अधिक पावसाची नोंद
esakal June 03, 2025 01:45 PM

पुणे : राज्यात यंदा मे महिन्यात पावसाने एक नवा विक्रम प्रस्थापित केला. सामान्यतः कोरडा आणि उष्ण असलेला हा महिना यंदा मुसळधार पाऊस आणि त्यामुळे निर्माण झालेल्या अभूतपूर्व पूरसदृश परिस्थितीमुळे गाजला. संपूर्ण राज्यात सरासरीच्या तुलनेत तब्बल एक हजार टक्क्यांहून अधिक पावसाची नोंद करण्यात आली. त्यामुळे जनजीवन मोठ्या प्रमाणावर विस्कळित झाले होते. सर्वाधिक पाऊस झालेल्या जिल्ह्यांपैकी एक पुणे असून, पुण्यामध्ये २५०.४ मिमी पावसाची नोंद करण्यात आली आहे. जी सामान्यपेक्षा ६५७ टक्के अधिक आहे.

भारतीय हवामानशास्त्र विभागाने दिलेल्या माहितीनुसार, राज्यात मे २०२५ मध्ये पूरसदृश स्थिती निर्माण झाली. मेमध्ये सरासरी १४.४ मिमी मासिक पावसाच्या तुलनेत यंदा १५९.४ मिमी पाऊस पडल्याची नोंद झाली. राज्यातील विविध हवामान उपविभागांमध्येही असाधारण पावसाची नोंद झाली आहे. कोकण आणि गोव्यामध्ये ४३७.८ मिमी इतक्या सर्वाधिक पावसाची नोंद करण्यात आली असून, ही सामान्य २५.४ मिमीच्या तुलनेत एक हजार ६२४ टक्के जास्त आहे, तर विदर्भ १३०.५ मिमी इतक्या पावसाची नोंद करण्यात आली.

या असामान्य हवामानाचे प्रमुख कारण म्हणून हवामान विभागाने अरबी समुद्रावरील मॉन्सूनपूर्व वातावरणातील बदल असे सांगितले आहे. पुणे हवामान विभागाचे हवामानशास्त्रज्ज्ञ वैज्ञानिक ‘डी’ डॉ. एस. डी. सानप यांनी या परिस्थितीवर प्रकाश टाकत सांगितले की, ‘‘अरबी समुद्रात कमी दाबाची प्रणाली तयार होऊन ती नंतर तीव्र झाली आणि मोठ्या प्रमाणात बाष्पाचे आगमन झाले. यामुळे २० मे पासून महाराष्ट्रात सर्वत्र पाऊस सुरू झाला. पुण्यात मे महिन्यात २०० मिमीपेक्षा जास्त पाऊस गेल्या दोन दशकांत तरी झालेला नाही.’’

१२ जूननंतर मॉन्सून पुन्हा होणार सक्रिय

यंदा मॉन्सूननेही सर्व विक्रम मोडले. राज्यात मॉन्सूनने नियत वेळेच्या तब्बल १४ दिवस आधी म्हणजे २५ मे रोजी प्रवेश केला; तर पुण्यातही २६ मे रोजी मॉन्सूनचे आगमन झाल्याने गेल्या ६३ वर्षांचा विक्रम मोडला. मात्र, ऐतिहासिक आगमन झाल्यानंतर सध्या कोणतेही कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय नाही, तर उत्तरेकडील कोरड्या वाऱ्यांच्या सततच्या प्रभावामुळे राज्यातील मॉन्सूनचा वेग मंदावले आहे. मात्र, १२ जूननंतर मॉन्सून राज्यात पुन्हा सक्रिय होण्याची शक्यता हवामानशास्त्र विभागाने वर्तविली आहे.

या घटनेला थेट हवामान बदलाशी जोडणे सध्या घाईचे होईल. असा कोणताही निष्कर्ष काढण्यापूर्वी सर्वसमावेशक वैज्ञानिक अभ्यासाची गरज आहे. आमचे पथक सध्या परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून असून सखोल विश्लेषण करत आहे. समुद्रातील वाढत्या तापमानामुळे हे बदल अधिक तीव्र झाले, ज्यामुळे तीव्र बाष्पयुक्त वाऱ्यांसह एकापाठोपाठ एक कमी दाबाच्या प्रणालींची निर्मिती होऊन पश्चिम आणि मध्य महाराष्ट्रात विशेषतः जोरदार वादळे आणि मुसळधार पाऊस झाला.

- डॉ. एस. डी. सानप, वैज्ञानिक ‘डी’, हवामानशास्त्र विभाग, पुणे

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.