नवी दिल्ली : अभियांत्रिकी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी घेतल्या जाणाऱ्या ‘जेईई ॲडव्हान्स्ड’ परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून देशपातळीवर आयआयटी दिल्ली विभागातील रजित गुप्ताने अव्वल स्थान प्राप्त केले आहे. रजितला ३६० पैकी ३३२ गुण प्राप्त झाले आहेत. पहिल्या दहा विद्यार्थ्यांमध्ये मुंबई विभागातील तीन विद्यार्थ्यांचा समावेश आहे. तिसऱ्या क्रमांकावरील माजीद हुसेन याला ३३०, चौथ्या क्रमांकावरील पार्थ वर्तक याला ३२७ तर सातव्या क्रमांकावरील साहिल देव याला ३२१ गुण मिळाले आहेत.
माजीद हुसेन हा मूळचा बुऱ्हाणपूरचा रहिवासी आहे. पार्थ वर्तक आणि साहिल देव हे मुंबईचे आहेत. देशात पहिला क्रमांक पटकावलेला रजित गुप्ता हा राजस्थानमधील कोटा येथील रहिवासी आहे. आयआयटी कानपूरकडून ‘जेईई ॲडव्हान्स्ड’ परीक्षेचे आयोजन करण्यात आले होते. पहिल्या दहा क्रमांकावर जे विद्यार्थी आले आहेत त्यात कोटा येथील चार विद्यार्थ्यांचा समावेश आहे. सलग दुसऱ्या वर्षी कोटा येथील विद्यार्थी या परीक्षेत पहिला आला आहे. रजित गुप्ता याला दहावीत ९६.०८ टक्के इतके गुण मिळाले होते. त्याचे वडील दीपक गुप्ता हे ‘बीएसएनएल’मध्ये अभियंता आहेत तर आई श्रुती या महाविद्यालयात प्राध्यापिका आहेत.
देशभरातील २२४ केंद्रांवर यंदा जेईई ॲडव्हान्स्ड परीक्षा घेण्यात आली होती. दोन सत्रात घेण्यात आलेली ही परीक्षा ३६० गुणांची होती. यातील दोन्ही पेपर हे प्रत्येकी १८० गुणांचे होते. यंदाच्या परीक्षेसाठी देशभरातील १.८७ लाख विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. यातील ५४ हजार ३७८ विद्यार्थी पात्र ठरले आहेत. विशेष म्हणजे यंदा कटऑफमध्ये मध्ये घट झाली आहे. आयआयटी खड्गपूर विभागातून परीक्षा दिलेला देवदत्ता मांझी ही विद्यार्थिनी ३१२ गुण प्राप्त करत मुलींमध्ये पहिली आली आहे.
‘जेईई ॲडव्हान्स्ड’चे दहा टॉपर- रजित गुप्ता (आयआयटी दिल्ली)ः ३३२ गुण
- सक्षम जिंदाल (आयआयटी दिल्ली) ः ३३२ गुण
- माजीद हुसेन (आयआयटी मुंबई) ः३३० गुण
- पार्थ वर्तक (आयआयटी मुंबई) ः ३२७ गुण
- उज्ज्वल केसरी (आयआयटी दिल्ली) ः ३२४ गुण
- अक्षत चौरसिया (आयआयटी कानपूर) ः ३२१ गुण
- साहिल देव (आयआयटी मुंबई) ः३२१ गुण
- देवेश भैया (आयआयटी दिल्ली) ः ३१९ गुण
- अर्णव सिंह (आयआयटी हैदराबाद) ः ३१९ गुण
- व्ही. लोकेश (आयआयटी हैदराबाद) ः ३१७ गुण