विमान चालवण्याचं, आकाशात उंच भरारी घेण्याचं स्वप्न अनेकजण बघतात. मात्र, आतापर्यंत या स्वप्नासाठी एक मोठी अट होती — १२ वी मध्ये Science शाखा असावी लागते, ज्यामुळे अनेक हुशार Arts आणि Commerce शाखेतील विद्यार्थी या क्षेत्रातून वंचित राहायचे. मात्र आता ही परिस्थिती बदलण्याची शक्यता निर्माण झाली आहे. हवाई वाहतुकीचं नियमन करणाऱ्या भारताच्या सर्वोच्च संस्था DGCA ( Directorate General of Civil Aviation ) ने एक महत्त्वपूर्ण शिफारस केली आहे, ज्यामुळे आता आर्ट्स आणि कॉमर्स शाखेतील विद्यार्थ्यांनाही Commercial Pilot License ( CPL ) साठी प्रशिक्षण घेता येणार आहे.
DGCA ने हा प्रस्ताव नागरी उड्डाण मंत्रालयाकडे पाठवला आहे. मंत्रालयाकडून मंजुरी मिळाल्यानंतर हा प्रस्ताव कायदा मंत्रालयाकडे जाईल आणि त्यानंतर अधिकृतपणे लागू होण्याची शक्यता आहे. या नव्या नियमाच्या अंमलबजावणीने १२ वी उत्तीर्ण, वैद्यकीयदृष्ट्या सक्षम आणि इतर आवश्यक परीक्षा उत्तीर्ण केलेले कोणतेही विद्यार्थी, मग ते कोणत्याही शाखेचे असोत, पायलट प्रशिक्षणासाठी पात्र ठरतील.
१९९० च्या दशकापासून CPL प्रशिक्षण फक्त सायन्स शाखेतील विद्यार्थ्यांसाठीच मर्यादित होते. यामुळे अनेक हुशार विद्यार्थी जे आर्ट्स आणि कॉमर्समध्ये होते, त्यांना पायलट होण्याची संधी मिळत नव्हती. अनेक अनुभवी पायलट आणि तज्ज्ञ यांचा असा विश्वास आहे की, पायलटसाठी आवश्यक असलेली फिजिक्स आणि गणिताची मूलभूत माहिती शाळेच्या सुरुवातीच्या वर्षांत मिळते. त्यामुळे फक्त Science शाखेची अट ही जुनी आणि आवश्यक नसलेली झाली आहे. गेल्या काही वर्षांत आर्ट्स व कॉमर्सच्या विद्यार्थ्यांना ओपन स्कूलमध्ये जाऊन फिजिक्स आणि गणिताची परीक्षा पुन्हा द्यावी लागली होती, ज्यामुळे त्यांचा प्रवास कठीण झाला.
DGCA ने या नव्या नियमामुळे पायलट होण्याची इच्छा असणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढेल, असा अंदाज व्यक्त केला आहे. त्यामुळे या वाढलेल्या मागणीला तोंड देण्यासाठी आणि प्रशिक्षणाचा दर्जा टिकवण्यासाठी भारतातील फ्लायिंग स्कूल्सना अधिक सक्षम करण्याच्या योजना सुरू करण्यात आल्या आहेत. DGCA चे अध्यक्ष फैज अहमद किदवई यांनी फ्लायिंग स्कूल्सना आदेश दिले आहेत की, त्यांच्या वेबसाइटवर प्रशिक्षणाचा कालावधी, उपलब्ध विमानांची संख्या, प्रशिक्षकांची उपलब्धता आणि सिम्युलेटरची स्थिती यासारखी माहिती पारदर्शकपणे प्रदर्शित करावी.
हा निर्णय केवळ एका मोठ्या अडथळ्याला मागे टाकण्याचा प्रयत्न नाही तर तो भारतातील विमानचालन क्षेत्रात समावेशकता वाढवण्याचा एक मोठा टप्पा ठरणार आहे. अनेक हुशार विद्यार्थी, जे आजपर्यंत फक्त शाखेच्या मर्यादेमुळे पायलट बनण्यापासून दूर राहिले होते, त्यांना आता आपल्या स्वप्नाला पूर्ण करण्याची संधी मिळणार आहे. यामुळे देशातील विमानचालन क्षेत्रालाही मोठा फायदा होण्याची शक्यता आहे, कारण या नव्या धोरणामुळे अधिक प्रमाणात प्रशिक्षित, कुशल आणि विविध पार्श्वभूमीच्या पायलट तयार होतील.