मुंबई : राज ठाकरे यांनी युतीसाठी दिलेल्या टाळीला शिवसेना ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी प्रतिटाळी दिली आहे. मात्र गेल्या दोन महिन्यांपासून शिवसेना ठाकरे पक्ष आणि मनसेमध्ये अद्याप युती झालेली नाही. तर दुसरीकडे गेल्या काही काळापासून युतीबाबत दोन्ही बाजूंनी टोलवाटोलवी सुरू झाली. असे असले तरी आगामी स्थानिक स्वराज्य निवडणुकीत ठाकरे बंधूंची युती होणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. अशातच आता शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी मनसेच्या नेत्यांकडून होणाऱ्या वक्तव्यावर भाष्य केलं आहे. (Sushma Andhare reacts to Uddhav Thackeray and Raj Thackeray coming together)
सुषमा अंधारे आज उद्धव ठाकरे यांच्या भेटीसाठी मातोश्री या निवासस्थानी गेल्या होत्या. यानंतर माध्यमांशी संवाद साधताना सुषमा अंधारे यांनी ठाकरे बंधू एकत्र येण्यावर भाष्य केलं. सुषमा अंधारे म्हणाल्या की, ते दोघेही भाऊ आहेत आणि त्या दोघांकडे एकमेकांचे मोबाइल नंबर आहेत. त्यामुळे त्यांना एकत्र येण्यासाठी आता कुठल्याही तिसऱ्या मध्यस्थाची गरज नाही. त्या दोघांना जेव्हा कधी वाटेल, तेव्हा ते मोबाइलवरून बोलतील आणि एकत्र येतील. मात्र मनसेच्या लोकांकडून जी काही वक्तव्यं केली जात आहेत, ती अपेक्षित नाहीत. तरीही मी आज उद्धव ठाकरेंना म्हटलं की, तुम्ही दोघेही एकत्र येण्याबाबत चर्चा सुरू आहे. त्यावर मला उद्धव ठाकरे असं म्हणाले की, आपल्याकडून काहीच प्रश्न नाही. आता निर्णय त्यांना (राज ठाकरे) घ्यायचा आहे. आता त्यांच्या कोर्टात चेंडू आहे आणि आम्ही आमची भूमिका स्पष्ट केली आहे. त्यामुळे आता यासंदर्भातला निर्णय मनसे अध्यक्षांना घ्यायचा आहे, असे सुषमा अंधारे यांनी स्पष्ट केले.
माध्यमांशी संवाद साधताना आदित्य ठाकरे यांनीही मंगळवारी (03 जून) म्हटले होते की, आम्ही आमच्याकडून प्रतिसाद दिला आहे. आमची भावना हीच आहे की, मराठी माणसाठी आणि महाराष्ट्राच्या हितासाठी जर कोणी सोबत येण्यास तयार असेल तर आम्ही त्यांना सोबत घेऊन लढण्यास तयार आहोत. डोंबिवलीत दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांनी एकत्र आंदोलन केले आहे. आमचं मन साफ आहे. त्यामुळे आता महाराष्ट्र हितासाठी जो कोणी पक्ष आमच्यासोबत येण्यासाठी तयार असेल, तर आम्ही महाराष्ट्र हितासाठी एकत्र लढू, अशी भूमिका आदित्य ठाकरे यांनी स्पष्ट केली होती.
हेही वाचा – Rohit Pawar : उद्या अजितदादांना ग्रामपंचायत निवडणुकीतही…; रोहित पवारांनी लगावला टोला