भारताने ऑपरेशन सिंदूर अंतर्गत केलेल्या कारवाईनंतर पाकिस्तान वठणीवर आले आहे. पाकिस्तानला आता भारतासोबत चर्चा हवी आहे. पाकिस्तानचे उपपंतप्रधान आणि परराष्ट्रमंत्री इशाक डार यांनी त्यासंदर्भात वक्तव्य केले आहे. ते म्हणाले, भारतासोबत चर्चेसाठी इस्लामाबादची तयारी आहे. आमचा देश प्रत्येक स्तरावर चर्चा करण्यास तयार आहे. भारतासोबत आम्हाला व्यापक चर्चा करायची आहे.
रॉयटर्सने दिलेल्या बातमीनुसार, इस्लामाबादमधील एका पत्रकार परिषदेत इशाक डार यांनी म्हटले की, भारत जेव्हाही चर्चेसाठी म्हणत असेल, तेव्हा चर्चा करण्याची आमची तयारी आहे. कोणत्याही स्तरावर आम्ही चर्चा करण्यास तयार आहोत. चर्चेसाठी आमची तयारी असली तरी आम्ही निराश झालेलो नाही. पाकिस्तान सर्वच मुद्यांवर चर्चा करु इच्छितो. परंतु भारत फक्त दहशतवाद्यावर फोकस करत आहे.
डार यांनी म्हटले की, चर्चेसाठी दोन लोकांची गरज असते. चर्चेसाठी आमच्या इतके गंभीर इतर कोणीच नाही. डार यांचे संकते भारताचे परराष्ट्र मंत्री एस.जयशंकर यांच्या वक्तव्याकडे होते. जयशंकर यांनी म्हटले होते की, पाकिस्ताससोबत चर्चा दहशतवादाचा मुद्यावर होणार आहे. पाकिस्तान व्याप्त काश्मीर रिकामे करण्यावर होणार आहे.
भारतासोबत नव्याने संघर्ष होण्याची शक्यता विचारली असता, डार म्हणाले की, भविष्य आम्ही सांगू शकत नाहीत, परंतु अशा कोणत्याही परिस्थितीची शक्यता खूपच कमी आहे. शस्त्रसंधीचा निर्णय अबाधित राहणार आहे. दोन्ही बाजूंनी सैन्य मागे घेण्याशी संबंधित सर्व पावले अंमलात आणली आहेत. या परिस्थितीत पुन्हा संघर्ष होण्याची शक्यता नाही, असे त्यांनी म्हटले.
पहलगाव येथे २२ एप्रिल रोजी दहशतवादी हल्ला झाला होता. त्यात २६ पर्यटकांची हत्या दहशतवाद्यांनी केली होती. त्यानंतर भारताने ६ ते ७ मे रोजी ऑपरेशन सिंदूर राबवत पाकिस्तान आणि पाक व्याप्त काश्मीरमधील दहशतवाद्यांची तळ नष्ट केली होती. भारताच्या ऑपरेशननंतर पाकिस्तानकडून करण्यात आलेले सर्व ड्रोन हल्ले आणि क्षेपणास्त्र हल्ले भारताने परतवून लावले होते. यामुळे पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचा प्रस्ताव आल्यानंतर १० मे रोजी शस्त्रसंधी करण्यात आली.